दुबई : कर्णधार रोहित शर्मापाठोपाठ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्व सामने एकाच मैदानावर खेळण्याचा भारतीय संघाला ‘गैर’फायदा मिळत असल्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. काही लोकांना तक्रार करण्याची सवयच असते. त्यांनी थोडे मोठे होण्याची गरज आहे, अशा शब्दांत गंभीरने टीकाकारांना सुनावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे आव्हान चार गडी राखून परतवून लावताना चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची एकूण पाचव्यांदा आणि सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. तसेच भारताच्या विजयामुळे अंतिम सामनाही दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार हेसुद्धा निश्चित झाले आहे. चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद पाकिस्तानकडे असले, तरी सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपला संघ पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबई येथे खेळवले जात आहेत.

एकाच मैदानावर सर्व सामने खेळल्याने येथील खेळपट्ट्या आणि परिस्थितीची भारतीय संघाला पूर्ण माहिती झाली आहे. याचा त्यांना मोठा फायदा मिळत असल्याची टिपण्णी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स, तसेच नासीर हुसेन आणि मायकल आथर्टन या इंग्लंडच्या माजी कर्णधारांनी केली होती. आता भारताने अंतिम फेरी गाठल्याने ही चर्चा अधिकच वाढण्याची शक्यता आहे. याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा टीकाकारांना प्रत्युत्तर देणे आवश्यक असल्याचे गंभीरला वाटले. ‘‘भारतीय संघाला गैरफायदा मिळत असल्याची खूप चर्चा केली जात आहे. मात्र, नक्की कसला गैरफायदा? आम्ही एकदाही या मैदानावर सराव केलेला नाही.

आम्हाला ‘आयसीसी’च्या अकादमीत सराव करावा लागत आहे. या दोन्ही ठिकाणची परिस्थिती आणि खेळपट्ट्या यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. काही लोकांना तक्रार करायची सवयच असते. जरा मोठे व्हा. आम्हाला कसलाही गैरफायदा मिळालेला नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळलो, त्यामुळेच यश मिळवले आहे,’’ असे गंभीर म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir responded to criticism over indian team getting advantage of dubai ground zws