Harbhajan Singh slams Pakistani journalist about Trophy 2025 : टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग अनेकदा सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटर्सना फटकारताना दिसतो. काही दिवसांपूर्वी, माजी पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमल आणि हरभजन सिंग यांच्यात सोशल मीडियावर जोरदार वाद झाला होता, तेव्हा भज्जीने अकमलला फटकारले होते, नंतर माजी पाकिस्तानी भारत आणि भज्जीची माफी मागताना दिसला होता. त्यानंतर आता भज्जीने एका पाकिस्तानी पत्रकाराला जोरदार फटकारले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकाराने भारतीय खेळाडूबद्दल केली पोस्ट –

वास्तविक, यावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन करत आहे. मात्र भारताने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानी पत्रकार फरीद खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून टीम इंडियाच्या खेळाडूंची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टमध्ये पत्रकाराने २००६ मध्ये शाहिद आफ्रिदीने हरभजन सिंगला मारलेल्या चौकार आणि षटकारांचा स्कोअरचार्ट शेअर केला आहे.

यानंतर हरभजन सिंगने या पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हरभजन सिंगने २००९ मध्ये श्रीलंकेच्या टीमच्या बसवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला होता, तेव्हाचा वृत्तपत्राचा स्क्रीनशॉट शेअर केला. ही पोस्ट शेअर करताना भज्जीने लिहिले की, “नाही, यासाठी नाही. क्रिकेटमध्ये नेहमीच हार-जीत होतच राहते. मी तुम्हाला सांगतो हीच खरी समस्या आहे. हा फोटो बघा. आता इथून एफ… काढा. तुम्हाला एफचा अर्थ कळला असावा की मी समजावून सांगू? एफ म्हणजे तुमचे नाव. कृपया एफ म्हणजे काय याचा वेगळा अंदाज लावू नका. मला काय म्हणायचे आहे, ते तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे शांती राखा.”

हेही वाचा – Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीयांसाठी मोठी घोषणा, दिग्गज उद्योगपती देणार अलिशान…

२००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर काही काळासाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता इतर संघ पाकिस्तान दौऱ्यावर जात असले, तरी टीम इंडिया कधीही पाकिस्तानचा दौरा करत नाही. टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये खेळली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आशिया कपबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरही यजमानपद पाकिस्तानकडे गेले, परंतु शेवटी ते हायब्रीड मॉडेल अंतर्गत होते, जिथे भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले आणि पाकिस्तानमध्ये फार कमी सामने खेळले गेले. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत न आल्यास त्यांच्याशिवाय ही स्पर्धा आयोजित केली जाईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावेळी स्पष्ट केले आहे. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने असेही म्हटले आहे की, पाकिस्तान भारतात होणाऱ्या आयसीसी टूर्नामेंटमध्येही सहभागी होणार नाही.

हेही वाचा – Harbhajan Singh : ‘आजकल क्या फूंक रहे हो…’, रिझवानची धोनीशी तुलना केल्याने हरभजन सिंगने पाकिस्तानी पत्रकाराला फटकारले

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. कारण ते २९ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर एका मोठ्या आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहेत. १९९६ मध्ये, त्यांनी एकदिवसीय विश्वचषक सह यजमानपद भूषवले होते. २००८ पासून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. पाकिस्तानने आयसीसीच्या विविध स्पर्धांसाठी भारताचा दौरा केला असताना, या दोघांमधील द्विपक्षीय मालिका बऱ्याच काळापासून स्थगित आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh slammed pak journalist farid khan tried to mock and target him for raising concerns over security issues vbm