दुबई : सलामीच्या लढतीतील पराभवानंतर दमदार पुनरागमनास उत्सुक असलेल्या भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असेल. पहिल्या साखळी लढतींतील निकालांनंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत चुरस निर्माण झाली असून भारतीत संघासाठी उर्वरित लढतींत विजय मिळवणे महत्त्वाचे झाले आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला शुक्रवारी सलामीच्या लढतीत न्यूझीलंडकडून ५८ धावांनी हार पत्करावी लागली. या मोठ्या पराभवामुळे भारताची निव्वळ धावगती -२.९९ अशी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित साखळी सामने जिंकण्यासह भारताला निव्वळ धावगतीत सुधारणा करण्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. फलंदाजांच्या हाराकिरीचा भारताला मोठा फटका बसला. भारताची एकही फलंदाज २० धावांचा टप्पाही ओलांडू शकली नाही.
हेही वाचा >>> युवा खेळाडूंच्या कौशल्याचा कस; भारत-बांगलादेश पहिली ट्वेन्टी२० लढत आज
तसेच भारताला संघनिवडीचा पेचही सोडवावा लागेल. सलामीच्या लढतीत वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीला संधी देताना भारताने एक अतिरिक्त फलंदाज खेळवणे टाळले. त्यामुळे फलंदाजी क्रमातही मोठा बदल करावा लागला. आता भारतीय संघ दयालन हेमलताला संधी देण्याबाबत विचार करू शकेल.
हरमनप्रीतला या वर्षी आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये खेळलेल्या १६ डावांत केवळ एक अर्धशतक करता आले आहे. त्यामुळे ती कामगिरी उंचावण्यात यशस्वी ठरते का, याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल.
गोलंदाजांची अनुभवी फळी
पाकिस्तानची फलंदाजी तितकीशी मजबूत नसली, तरी त्यांच्याकडे अनुभवी गोलंदाज आहेत. निदा दार, कर्णधार फातिमा सना आणि सादिया इक्बाल यांसारख्या गोलंदाज प्रभावी मारा करण्यात सक्षम आहेत. सलामीच्या लढतीत पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय साकारला होता.
● वेळ : दुपारी ३.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अॅप
© The Indian Express (P) Ltd