आशियाई कबड्डी सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचे आगमन
आशियाई कबड्डी स्पध्रेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या महिला संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रेचे मंगळवारी मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. अभिलाषाबरोबर तिची संघ सहकारी सायली जाधवचेही स्वागत करण्यात आले. अभिलाषा व सायली मुंबई उपनगराकडून खेळतात. तिच्या स्वागतासाठी मुंबई उपनगर कबड्डीचे सचिव रमेश हरियन तसेच अभिलाषाचे प्रशिक्षक सुहास कदम, तिचे वडील शशिकांत म्हात्रे आणि कबड्डीप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
विमानतळावर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आल्यानंतर तिचे नवी मुंबईतही मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. तिच्या स्वागतासाठी तिचे चाहतेमंडळी उपस्थित होती. ‘महाराष्ट्रातील महिला कबड्डी खेळाडूला देशाच्या संघाचे नेतृत्व करण्याची पहिल्यांदाच मला संधी मिळाली आणि माझ्या नेतृत्वात संघाला विजेतेपद मिळवून दिले, याचा खूप आनंद व अभिमानही वाटतो. जेतेपदाचा क्षण आयुष्यातील सर्वात आनंददायी होता. इराणविरुद्धच्या लढतीत प्रेक्षकांचा पाठिंबा स्थानिक संघाला होता आणि त्यामुळे त्यांच्या नावाचा जयघोष सुरू होता. मात्र, सहकाऱ्यांच्या साथीने मी उत्कृष्ट खेळ करीत तिरंगा डौलाने फडकवण्यात यशस्वी झालो, असे अभिलाषाने या वेळी सांगितले.