RCB Victory Parade Stampede in Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल १८ वर्षांनी आयपीएलचा चषक उंचावला आहे. यानिमित्त बंगळुरूत आरसीबीच्या संघाची विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आरसीबीचं होम ग्राऊंड असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचा विजयी जल्लोष अनुभवण्यासाठी चाहत्यांनी तुफन गर्दी केली होती. त्याचवेळी चेंगराचेंगरी होऊन ११ जण दगावले, तर ४७ जण जखमी झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या विजयाचं सेलिब्रेशन चालू होतं. तर, स्टेडियमबाहेर शोकाकूल व भीतीचं वातावरण होतं.
बंगळुरू पोलीस, आरसीबी संघव्यवस्थापन, स्टेडियम व्यवस्थापनाच्या नियोजनातील ढिसाळपणा दिसून आला. मैदानात सेलिब्रेशनला उपस्थित राहण्यासाठी मोफत पासेस मिळलीत अशा गोंधळातून मोठी गर्दी जमा झाली होती आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे बंगळुरू पोलीस व आरसीबीच्या संघव्यवस्थापनावर टीका केली जात आहे. इतकी भीषण घटना घडूनही संघ व्यवस्थापनाने त्यांचा विजयी जल्लोष चालू ठेवला. स्टेडियमबाहेर ११ जण दगावलेले असताना आरसीबीने त्यांचा नियोजित कार्यक्रम पुढे रेटला. ही आरसीबीच्या संघव्यवस्थापनाची असंवेदनशीलता असल्याची टीका होत आहे.
समाजमाध्यमांवर अनेकांनी आरसीबी संघ व्यवस्थापनावरील संताप व्यक्त केला आहे. काहींनी म्हटलं आहे की ही भीषण घटना पाहून आरसीबीने त्यांचा विजयी जल्लोषाचा कार्यक्रम रद्द करायला हवा होता.
नेमकी घटना काय?
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात (३ जून) आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव केला. आरसीबीने १८ वर्षांनी हा विजय मिळवल्याने देशभरातील या संघाच्या चाहत्यांनी तीन जूनच्या रात्रीपासूनच जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, चार जून रोजी आरसीबीचा संघ अहमदाबादवरून बंगळुरूला परतला. ४ जून रोजी सायंकाळी बंगळुरूतील विधान सौधा या ठिकाणापासून चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत व्हिक्टरी परेड निघेल हे सांगण्यात आलं होतं. यासाठी काही मर्यादित मोफत पासेसही दिले जातील, असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, त्यातून गोंधळ उडाला व पुरेशी माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचली नाही. परिणामी गर्दीचे घोळकेच्या घोळके मैदानाच्या दिशेने येऊ लागले. काही वेळात स्टेडियमबाहेर मोठा जनसागर उसळला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली.