Jitesh Sharma Celebration Video: आयपीएल २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगला. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकांअखेर २२७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ चेंडू ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल २०२५ स्पर्धेतील क्वालिफायर १ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दरम्यान या सामन्याचा हिरो ठरलेल्या जितेश शर्माने विजयानंतर हेल्मेट सेलिब्रेशन केलं. जे सध्या तुफान चर्चेत आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष जोरदार होणारच होता. सामना जिंकताच जितेश शर्माने विजयाचा जल्लोष करताना आपलं हेल्मेट काढलं आणि फेकणारच होता, इतक्यात त्याने प्लॅन बदलला. हे सेलिब्रेशन त्याने लखनऊचा गोलंदाज आवेश खानसमोर केलं. आवेश खानने २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केल्यानंतर हेल्मेट जमिनीवर आदळून सेलिब्रेशन केलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जितेश शर्माचा फोटो शेअर करत, “आम्ही हेल्मेट फेकत नाही, त्याचा आदर करतो.” असे लिहिले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाव न घेताच आवेश खानला टोमणा मारला आहे. या पोस्टवर नेटकरीही आपल्या प्रतिक्रीया देत आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या मिचेल मार्शने ३७ चेंडूंचा सामना करत ६७ धावांची खेळी केली. तर कर्णधार ऋषभ पंतने ६१ चेंडूंचा सामना करत नाबाद ११८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले. या खेळीच्या बळावर लखनऊ सुपर जायंट्सने २० षटकांअखेर ३ गडी बाद २२७ धावा केल्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या जोडीने सलामीला फलंदाजी करताना ६१ धावा जोडल्या.

फिल सॉल्ट ३०, तर विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. शेवटी जितेश शर्माने अवघ्या ३३ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याला साथ देत मयांक अगरवालने नाबाद ४१ धावांची खेळी करत संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.