महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतले मल्ल म्हणून ओळख असलेल्या रुस्तम ए हिंद दादू चौगुले यांचं रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. महाराष्ट्राच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यामध्ये दादू चौगुलेंनी मोठा हातभार लावला होता. ३ दिवसांपूर्वी दादू चौगुलेंना धाप लागल्यामुळे कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी उपचारादरम्यान दादू कोमामध्ये गेले.
रविवारी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान दादूंना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्यांची प्राणज्योत मालवली. १९७३ साली न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दादू चौगुलेंनी रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच कोल्हापूर आणि राज्यभरातील त्यांच्या शिष्यांना धक्का बसला आहे.
कोल्हापुरातील मोतीबाग तालमीत दादूंनी कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. १९७० साली दादूंनी महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावला होता. यानंतर १९७३ सालीच दादूंनी रुस्तम ए हिंद आणि भारत केसरी असे दोन्ही किताब पटकावले होते. कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा ध्यानचंद पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.