तब्बल ४० वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईचे आव्हान यंदा उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर मुंबई क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणेच झाडाझडती सुरू झाली. मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. मुंबई पराभूत झाल्यानंतर तांत्रिक समितीने प्रशिक्षक कुलकर्णी आणि निवड समिती बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी समितीने कुलकर्णी यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला, तर निवड समितीला मात्र हंगाम संपेपर्यंत अभय देण्यात आले आहे. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील संघर्ष मुंबईच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चाही क्रिकेट वर्तुळात होत आहे. परंतु मुंबईसाठी सर्वच गटांमध्ये यंदाचा हंगाम वाईट ठरला आहे. त्यामुळे मुंबईच्या कामगिरीचे एकंदर आत्मपरीक्षण करून मगच निर्णय व्हायला हवा होता, असे मत ‘चर्चेच्या मैदानातून’च्या व्यासपीठावर व्यक्त करण्यात आले आहे.
सुलक्षण कुलकर्णी,
मुंबईचे माजी प्रशिक्षक
अपयश हे केव्हाही एका दिवसात येत नसते, ती अनेक दिवसांची प्रक्रिया असते. महाराष्ट्राविरुद्ध दुसऱ्या डावात आमची फलंदाजी कोसळली, हेच फक्त अपयश नव्हे. एमसीएच्या तांत्रिक समितीसमोर मी मुंबईच्या कामगिरीची सविस्तर चर्चा केली. संघातील महत्त्वाचे दहा खेळाडू हंगामात पूर्णत: उपलब्ध नव्हते. तसेच दुसरी फळीसुद्धा तितकी सक्षम नव्हती. १९७१मध्ये मुंबईचे सहा खेळाडू अनुपलब्ध होते, तरीही आपण रणजी करंडक जिंकलो होतो. कारण त्यावेळी मुंबईच्या क्रिकेटचा ढाचा सक्षम होता. दुसरी व तिसरी फळीसुद्धा चांगली होती. सध्या क्लब व ऑफिस क्रिकेटचा ढाचा योग्य नाही. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. बाकी एमसीएच्या निर्णयाचे मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. कारण रणजी, इराणी, विल्स जेतेपदासहित ३५ पैकी ३३ सामने प्रशिक्षक बलविंदरसिंग संधू यांनी जिंकून दिले होते. परंतु १९९७-९८च्या उपांत्य फेरीत मुंबई हरली व त्यांना पद गमवावे लागले. तर प्रवीण अमरेंच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने पाचपैकी तीन रणजी जेतेपद जिंकले. मात्र २०१०-११चा एक हंगाम मुंबईसाठी खराब गेला व त्यांचे पदही गेले.
पी. व्ही. शेट्टी,
एमसीएचे संयुक्त सचिव
लालचंद रजपूत,
भारतीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक