दक्षिण आफ्रिकेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. केप टाऊनमध्ये ही परिस्थिती आणखी गंभीर आहे, तेव्हा या शहराची पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघानं आर्थिक सहाय्य देऊ केलं आहे. भारतीय संघानं दिलेल्या या निधीतून बोअरवेल खणल्या जाणार आहेत तसेच पाण्याच्या बाटल्यांचेही वाटप करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यांपासून केप टाऊनमध्ये पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. यावेळी भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघानं मिळून ‘गिफ्ट ऑफ गिवर’ संस्थेला साडे पाच लाखांचा धनादेश दिला आहे. ‘केप टाऊन हे जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. आम्ही ज्यावेळी या शहराला भेट देतो तेव्हा इथले स्थानिक लोक आम्हाला भरभरून प्रेम देतात. आमचे आपुलकीनं स्वागत करतात. या शहरात भीषण पाणीटंचाई आहे, त्यामुळे इथल्या दुष्काळाविषयी जनजागृती करून आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत. बाहेरील लोकांना यामुळे पाणीटंचाईची समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येईल आणि तेही मदत करतील’ असं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील ट्विट करत या शहरातील पाणी समस्या लवकर दूर होवो अशी प्रार्थना केली आहे. सध्या पाणीटंचाईमुळे या शहरातील लोकांना दिवसाला फक्त ८७ लीटर पाणी वापरण्याची परवानगी आहे. तसेच शहरातील अनेक हॉटेल्समध्येही पाणी पुरवठा कपात करण्यात आला आहे. शहरात आलेल्या पर्यटकांना पाण्याची नासाडी रोखण्याची सूचनाही करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and team india donate to the cape town water crisis