सिडनी कसोटी सामन्यात अंधुक प्रकाश आणि पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्यावरचा पराभव टाळण्यात यशस्वी झाला. 1947 सालपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यास सुरुवात झाली. यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकलेला आहे. एकाही आशियाई देशाला ऑस्ट्रेलियात अशी कामगिरी करता आलेली नाहीये. पाचव्या दिवशी दोन्ही पंचांनी कर्णधाराच्या सहमतीने सामना अनिर्णित झाल्याचं घोषित केल्यानंतर टीम इंडियाने सिडनीच्या मैदानात एकच जल्लोष केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित खेळाडूंनी जल्लोष करत एकमेकांचं अभिनंदन केलं. यानंतर सर्वांनी मैदानात येऊन डान्सही केला. मालिकेत आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या पुजारालाही इतर खेळाडूंनी ठेका धरायला भाग पाडलं.

मालिकेत केलेल्या कामगिरीसाठी चेतेश्वर पुजाराला सामनावीर आणि मालिकावीर किताबाने गौरवण्यात आलं. भारतीय गोलंदाजांनी सर्व कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दोन्ही वेळा बाद करण्यात यश मिळवलं. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 च्या फरकाने बाजी मारली. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch indian cricket teams celebratory dance at the scg