IND vs ENG 5 Reasons of India Defeat in Leeds test: भारतीय संघाला इंग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटीत ५ विकेट्सने पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या होत्या, इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते पण तरीही शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली संघाने सामना गमावला. भारताच्या या पहिल्या सामन्यातील पराभवाची कारणं काय ठरली, जाणून घेऊया.

दुसरीकडे, इंग्लंडने लीड्स कसोटीत इतिहास लिहिला. लीड्सच्या मैदानावर धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा हा सर्वात मोठा विजय आहे. इंग्लंडने पाच विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडच्या विजयाचा नायक बेन डकेट ठरला, ज्याने पहिल्या डावात ६२ धावा आणि दुसऱ्या डावात १३७ धावांची अप्रतिम खेळी केली.

भारतीय संघाच्या फलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोठी भूमिका बजावली. पण भारताने या सामन्यात अनेक चुका केल्या. टीम इंडियाने दोन्ही डावांमध्ये फिल्डिंग करताना अनेक चुका केल्या आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक झेल सोडले. तर गोलंदाजांचा फॉर्म तसंच भारताची खालची फलंदाजी फळी अपयशी ठरल्याचा संघाला फटका बसला.

भारताच्या पराभवाची ५ कारणं

भारताची फिल्डिंग आणि यशस्वी जैस्वालचे ड्रॉप कॅच

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात फारच खराब क्षेत्ररक्षण केले. भारताने या सामन्यात खूप झेल सोडले. विशेषतः यशस्वी जैस्वालने तर ४ झेल एकट्याने सोडले. पहिल्या डावात भारताने ५ झेल सोडले. दुसऱ्या डावात २ झेल टीम इंडियाकडून सुटले. पण दुसऱ्या डावात जॅक क्रॉलीचा झेल सोपा नव्हता. जसप्रीत बुमराहने फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही.

भारताची खालची फलंदाजी फळी

भारतीय संघाच्या खालच्या फळीतील फलंदाजांने संघाला अक्षरश: तोंडावर पाडलं. दोन्ही डावात भारताची खालची फलंदाजी फळी मैदानावर टिकू शकली नाही आणि झटपट विकेट्स गमावले. पहिल्या डावात शेवटच्या ७ विकेट्स ४१ धावांवर पडल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ३१ धावांवर ६ विकेट्स पडल्या. फलंदाजीसाठी चांगली असलेल्या खेळपट्टीवर ७२ धावांवर १३ विकेट्स गमावणे हे पराभवाचे एक प्रमुख कारण आहे.

भारताच्या गोलंदाजी युनिटचा फॉर्म

जसप्रीत बुमराह वगळता भारताचा गोलंदाजी विभाग फारच कमकुवत दिसत होता. मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी केली पण त्याला विकेट घेता आल्या नाहीत. तर पहिल्या डावात सिराजची फलंदाजांनी धुलाई केली. प्रसिद्ध कृष्णा खूपच महागडा ठरला. त्याने दोन्ही डावात ६ पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीचा फारसा प्रभाव दिसून आला, त्याला गोलंदाजीची संधीही फार कमी देण्यात आली. शिवाय त्याला फलंदाजीतही चांगली कामगिरी करता आली नाही. तर जडेजालाही फक्त एकच विकेट घेण्यात यश आलं.

नाणेफेक

लीड्समध्ये भारताच्या पराभवाचे एक कारण म्हणजे नाणेफेक. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्याने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले होते. २०१७ नंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने लीड्समध्ये विजय मिळवण्याची ही ७वी वेळ आहे. २५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य ५ वेळा साध्य करण्यात आले. ३२० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठण्याची ही तिसरी वेळ आहे. भारताने जर दुसऱ्या डावात अधिक धावा केल्या असत्या अथवा पहिल्या डावात इंग्लंड संघाला लवकर बाद केलं असत तर संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला असता.

गोलंदाजांचा वापर

भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिल प्रथमच कसोटीमध्ये भारताचं नेतृत्त्व करत आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये आयपीएलमध्ये संघाचं नेतृत्त्व केलं आहे पण कसोटीत ही त्याची पहिलीच वेळ आहे. शुबमन गिलला या सामन्यात गोलंदाजांना योग्य वेळी वापरता आलं नसल्याचही दिसलं. पहिल्या डावात चौथा गोलंदाजी पर्याय असलेल्या शार्दुल ठाकूरला फार उशिरा गोलंदाजी दिली आणि कमी षटकंही देण्यात आली. तर जडेजालाही त्याने उशिरा गोलंदाजी दिली.