वास्तुरचना आणि आपले हवामान यांचा सर्वात जवळचा संबंध आपल्या पूर्वजांनी केंव्हाच ओळखला होता. गरज आहे ती त्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन जाणून घेऊन, त्याचा वापर आजच्या वास्तुचनेत करण्याची.
सध्या टीव्हीवर एक मालिका चालू आहे. त्यातील एका प्रमुख पात्राच्या तोंडी सतत एक वाक्य दिले आहे- ‘परंपरेशी तडजोड नाही’. या सीरिअलमध्ये आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक काही नियम, चालीरीती आखून दिल्या आहेत आणि त्या पाळणे किती गरजेचे आहे वगरे गोष्टी सांगितल्या आहेत. गंमत म्हणून ती सीरिअल पाहताना जाणवले की, खरंच आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार केला होता. पण दुर्दैवाने त्या मागील शास्त्र आपण समजून न घेता परंपरेच्या नावाखाली आंधळेपणाने त्याला नको तो अर्थ देत आहोत.
कॉलेजमध्ये असताना आम्हाला क्लायमॅटोलॉजी किंवा ऋतुचक्र, हवामानाबद्दल लेक्चर्स असायची. कुठल्याही वास्तुतज्ज्ञाला इमारत बांधण्यापूर्वी त्या जागेच्या हवामानाबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. मुंबईत बांधल्या जाणाऱ्या इमारती व चेरापुंजीला बांधल्या जाणाऱ्या इमारती यांमध्ये खूप फरक आहे किंवा असावाच. हा फरक मुख्यत्वे दोन्हीच्या भौगोलिक फरकामुळे आहे. याच्या पूर्ण अभ्यासाशिवाय इमारती बांधणे शुद्ध वेडेपणा ठरेल. आणि याचाच सखोल विचार आपल्या पूर्वजांनी केला होता. भारताची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन वास्तुरचनेचे काही नियम त्यांनी लोकांना घालून दिले. यासाठी त्यांनी दिशांचा अभ्यास करून नसíगक ऊर्जा, जी आपल्याला मुबलक प्रमाणात फुकट मिळते आहे, त्याचा वापर कसा करावा हे सांगितले. त्याचबरोबर पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांचा आपल्या मनावर व शरीरावर होणारा परिणाम त्यांनी अभ्यासिला. थोडक्यात वास्तुरचना म्हणजे नसíगक गोष्टींबरोबर साधलेला समतोल हा मुख्य उद्देश समोर ठेवला.
दुसरे, दक्षिणेला उंच िभत बांधणे व दारे खिडक्या न ठेवणे याचे प्रमुख कारण म्हणजे भारताची भौगोलिक स्थिती. आपल्याला माहितीच आहे की मान्सूनचा पाऊस दक्षिण- पश्चिमेकडून येतो. वाऱ्यामुळे आडवातिडवा कसाही घरात घुसणाऱ्या पावसाने काय हाल होतात हे मी प्रत्यक्ष बघितले आहे. माझ्या ग्राहकाचा वरळीला १४ व्या मजल्यावर सी फेसिंग फ्लॅट आहे. त्या फ्लॅटची पावसामुळे झालेली दुर्दशा अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. ह्यचे मुख्य कारण दक्षिण-पश्चिमेकडील खिडक्या. एकतर आजकाल खिडक्यांना छज्जे नसतात. त्यामुळे पाऊस अडत नाही. खिडक्यांच्या फटींमधून पाणी येऊन फक्त याच खोलीत सुनामीसदृश वातावरण झाले होते. बाकीच्या दिशांना असलेल्या खोल्या पाषाणासारख्या कोरडय़ा ठणठणीत होत्या! अशावेळी सांगा दक्षिण दिशेची काय चूक? वास्तुतज्ज्ञाने दिशांचा नीट अभ्यास करून खिडक्यांची रचना केली असती तर ही वेळच आली नसती.
अभ्यासाच्या जागेप्रमाणेच भर दिला गेला स्वयंपाकघरावर. सकाळची लगबग सुरू होणारे घरातील हे प्रथम व मुख्य स्थान. याच्या स्थानाबद्दलसुद्धा मला वाटते की सूर्याचा प्रामुख्याने विचार केला गेला असावा. सूर्याची कोवळी उन्हे अन्नपदार्थावर पडल्यास त्यातील बॅक्टेरिया नाश पावून सकसपणा वाढीस लागतो हे आपण जाणतोच. हेच प्रमुख कारण असावे पूर्वेला किंवा आग्नेयला स्वयंपाकघर ठेवण्याचे. त्याचप्रमाणे पूर्वी खिडकी हे एकच साधन होते स्वयंपाकघरातील वास व धूर बाहेर घालवायचे. अशा वेळी भारतीय उपखंडातील वाऱ्याच्या दिशेचा अभ्यास करून स्वयंपाकघर या दिशांना ठेवल्यास वास व धूर घराच्या आतमध्ये न शिरता बाहेर फेकला जाई.
पश्चिमेचा वारा म्हणजे सर्वात आल्हाददायक! त्यामुळे पूर्व-पश्चिम दिशेला घराचे तोंड असण्याचा अजून एक फायदा म्हणजे उत्कृष्ट वायुविजन किंवा व्हेंटिलेशन. नवरा-बायकोच्या भांडणाने तापलेले वातावरण थंड करण्याचा हा नसíगक उपाय. तुम्ही आलिया भटचा ‘टू स्टेट्स’ पिक्चर पाहिला असेल, तर तुम्हाला तिच्या घराच्या मधोमध असलेला चौक नक्कीच आवडला असेल. मोहेंजोदडो संस्कृतीपासून ते आत्ताच्या वाडा संस्कृतीपर्यंत असे ‘ओपन टू स्काय’ चौक भारतीय वास्तुरचनेची खासियत होती. पूर्व-पश्चिम दिशेला उघडणारा हा चौक घरात हवा खेळती ठेवून, तापमान आल्हाददायक ठेवण्याचे काम करायचा. आजकाल फ्लॅट संस्कृतीमुळे ही रचना काळाच्या पडद्याआड गेली आहे. पण जर का आपण पूर्व-पश्चिम दिशेला दारे-खिडक्या असणारे घर निवडले तर हवा खेळती राहायला नक्कीच मदत होईल.
प्रत्येक दिशेची खास वैशिष्टय़े आपण पहिली. पण त्याच बरोबर घरात भरपूर नसíगक उजेड येणेपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे. इंग्लंडसारख्या ठिकाणी हिवाळ्यात जेव्हा दिवसेन् दिवस सूर्याचे दर्शन होत नाही, त्या वेळी लोकांमध्ये नराश्याचे झटके येण्याचे प्रमाण कैक पटींनी वाढते. अशा वेळी बीबीसीवर लोकांचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी दिवसभर मनोरंजनाचे कार्यक्रम मुद्दामहून दाखवले जातात. आपल्याकडे नशिबाने भरपूर उजेड असतो, त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.
वास्तुरचनेबद्दल हा शास्त्रीय दृष्टिकोन समजल्यानंतर मनोमन मी आपल्या पूर्वजांसमोर नतमस्तक झाले. हाताशी काहीही साधने नसताना प्रत्येक गोष्टीची शास्त्रोक्त पद्धतीने केलेली आखणी बघून आपल्या परंपरेविषयीचा अभिमान दुणावला. टीव्हीवरील सीरिअलचे पुढे काय होईल माहीत नाही. पण शास्त्रीय कारण दिलेत तर परंपरेशी हातमिळवणी करायला मला मात्र नक्कीच आवडेल.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com