यंदा हिंगोलीत अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी संध्याकाळनंतर १२ तासांत तब्बल १३६ मिमी पावसाची नोंद झाली. परिणामी शेतकऱ्यांचे उरलेसुरले सोयाबीन पीकसुद्धा हातचे गेले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्य़ात अतिवृष्टीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पीक नुकसानीचे तिसऱ्यांदा सरसकट सर्वेक्षण पुनर्वसन मंत्र्याच्या आदेशावरून जिल्हा प्रशासन करणार असतानाच बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्ह्य़ात पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकाचे या पावसाने नुकसान केले.(२४ तासांत पडलेल्या पावसाची गुरुवारी सकाळी ८ पर्यंतची नोंद मिमीमध्ये, कंसात आजवरचा एकूण पाऊस.) हिंगोली १३६ (१२५८.१), वसमत २१.४३ (९७६.६१), कळमनुरी ८०.१७ (१०७२.९४), औंढा नागनाथ २६.२५ (१२७५.८७), सेनगाव २३.६७ (१०८२.६८). १ जून ते ३ ऑक्टोबपर्यंतचा पाऊस ५६६६.११ मिमी. चालू वर्षी पडलेल्या पावसाची सरासरी १२८.७४ टक्के असून, गतवर्षी याच तारखेला ती ७३.२१ टक्के होती.