जालना : जालना शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने ४८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. या अंतर्गत जायकवाडीवरून घेण्यात आलेल्या योजनेसाठी ३५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे आणखी एक अतिरिक्त जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहराच्या पाणीपुरवठय़ाचा आणखी एक स्रोत असलेल्या संत गाडगेबाबा जलाशयाच्या (घाणेवाडी) योजनेतून नवीन जलवाहिनी आणि १५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दानवे यांनी सांगितले, की जायकवाडीवरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्यावर शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेसाठी शासनाने १२९ कोटी रुपयांचा निधी देऊनही पाणी प्रश्न सुटला नव्हता. दहा-पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १५ जून २०२२ रोजी जालना शहरात जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी राज्यात आमची सत्ता आल्यास जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे) सरकार येताच आपण या संदर्भात संबंधित वरिष्ठ आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठका घेऊन पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याच्या संदर्भात निर्देश दिले. नवीन कामांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला असता त्यांनी त्यास तातडीने मान्यता दिली. नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून जालना शहरातील पाणीप्रश्न तीव्र झालेला होता. नवीन सरकारने तातडीने या प्रश्नात लक्ष घालत आणि जालना शहरातील पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी ४८ कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली, असे दानवे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 48 crore fund for water supply scheme of jalna city zws