अहिल्यानगर: पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूरमध्ये केलेल्या कारवाईत तीन तरुणांकडून ५ गावठी कट्टे, ९ जिवंत काडतुसे व पल्सर मोटरसायकल जप्त केली. आज मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी ही माहिती दिली. अक्षय उर्फ भावड्या संजय माळी (वय २३, फत्तेपूर, नेवासा, अहिल्यानगर), अजय शिवाजी मगर (वय २५, नांदूर शिखरी, नेवासा, अहिल्यानगर) व योगेश मच्छिंद्र निकम (वय ३५, वडगावगुप्ता, अहिल्यानगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांकडून एक पल्सर मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने विशेष तपास मोहीम सुरू केली. त्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तीन आरोपी शस्त्र विक्रीसाठी श्रीरामपूरमध्ये येत असल्याचे समजले होते. त्यानुसार श्रीरामपूर शहरातील रेल्वे उड्डाणपूलजवळ, हरेगाव फाटा येथे पोलीस निरीक्षक कबाडी यांच्यासह अंमलदार पंकज व्यवहारे, अतुल लोटके, उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दीपक घाटकर, फुरकान शेख, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना पकडले. या तिघांनीही मध्य प्रदेशमधून गावठी कट्टे विक्रीसाठी आणले होते.

यापूर्वीही पोलिसांनी मध्य प्रदेशमधून विक्रीसाठी आणलेले गावठी कट्टे जिल्ह्यात जप्त केले. मात्र, त्यामध्ये केवळ गावठी कट्ट्यांची स्थानिक पातळीवर खरेदी विक्री करणारे तरुणच अटक केले जात आहेत. मध्य प्रदेशमधून शस्त्र आणणारे मात्र मोकाटच राहत आहेत. मध्य प्रदेशमधील शस्त्र कारखान्यापर्यंत महाराष्ट्र पोलीस पोचू शकत नाहीत. त्यामुळे या खरेदी विक्रीला आळा बसलेला नाही. गावठी कट्ट्यांबरोबर जिवंत काडतुसेही जप्त केली जातात. मात्र, ही काडतुसे कोठे तयार केले जातात, त्यासाठीची स्फोटक पावडर कुठून आणली जाते, याचा पोलिसांनी आजवर शोध घेतलेला नाही.

नऊ महिन्यांत ४२ गावठी कट्टे जप्त

जिल्हा पोलीस दलाने १ जानेवारी ते २ सप्टेंबर २०२५ या ९ महिन्यांत ३९ घटनांमध्ये ४२ गावठी कट्टे तसेच ११८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने १२ कारवायांमध्ये १७ गावठी कट्टे व २९ काडतुसे जप्त केली आहेत. जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे.