सोलापूर : शिर्डी येथे संत साईबाबांचे दर्शन घेऊन खासगी आराम बसमध्ये बसून गावाकडे परतणाऱ्या आंध्र प्रदेशातील भाविकांच्या १४ प्रवासी पिशव्या बसमधील मागच्या बाजूच्या डिक्कीतून चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

तेलुगुभाषक असलेले हे सर्व भाविक आंध्र प्रदेशातील येल्लूर जिल्ह्यातील राहणारे आहेत. दोन दिवसांपूर्वी हे सर्व भाविक खासगी आराम बसने शिर्डीला संत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर गावी परतण्यासाठी हे भाविक रात्री सोलापूरमार्गे परतीचा प्रवास करीत होते. पहाटे दोनच्या सुमारास आराम बस करमाळ्याजवळ काही वेळ थांबली होती. नंतर सोलापुरात सकाळी सात वाजता बस पोहोचल्यानंतर प्रवासी बसमधून खाली उतरले. तेव्हा बसच्या पाठीमागील डिक्कीत प्रवाशांच्या ठेवलेल्या प्रवासी पिशव्या गायब झाल्याचे आढळून आले.

एकूण १४ प्रवाशांच्या पिशव्या चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. तेव्हा घाबरलेल्या प्रवाशांनी आपली प्रवासी आराम बस तशीच फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेली. दरम्यान, हा प्रकार सोलापुरातील तेलुगुभाषक असलेले भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सर्व प्रवाशांना मदतीचा हात देत पोलिसांना चोरीची फिर्याद दाखल करून घेण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार नागलक्ष्मी लक्ष्मीनारायण दंतू (वय ४०) या प्रवासी महिलेने पोलिसांत फिर्याद नोंदविली. यात प्रवाशांचे वापरते कपडे, रोख रक्कम व अन्य साहित्य असलेल्या १४ पिशव्या चोरीला गेल्याचे म्हटले आहे. त्यांची किंमत ४३ हजार रुपये इतकी दर्शविण्यात आली आहे.