राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर शिंदे यांनी प्रथमच राळेगणसिद्घी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली.
हजारे यांच्यामुळेच माहितीच्या अधिकाराचा कायदा झाला. त्यांच्या सूचनांचा राज्याच्या तसेच जिल्हय़ाच्या विकासासाठी नक्कीच उपयोग होईल, असे शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्हय़ातील गुन्हेगारी घटना चिंताजनक आहेत. या घटनांची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरही झाली. परंतु पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन हे आव्हान स्वीकारतानाच सर्व गुन्हय़ांचा शोध लावण्यात यश मिळविले ही समाधानाची बाब आहे.
संत यादवबाबा मंदिरात हजारे व शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेत हजारे यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे सांगितले. जलसंधारणाबाबत अलीकडेच मंत्रालयात आपली मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली, परंतु अपु-या वेळेमुळे सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली नसल्याचे सांगून हजारे यांनी गेल्या पाच वर्षांत काँग्रेस आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर एकही बैठक बोलावली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. राज्य सरकारने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानात मृद्संधारणाच्या कामावर भर देणे गरजेचे आहे. पावसाबरोबर वाहून जाणारी माती गावातच अडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे हजारे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister shinde met hazare