कोल्हापूर : पुरातत्व खात्याच्या नियमावलीचे पालन करून तसेच पन्हाळावासीयांना विश्वासात घेवूनच पन्हाळा जागतिक वारसा स्थळाचे काम केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी दिले.

जागतिक वारसा स्थळात पन्हाळागडाचा समावेश करण्यास होत असलेल्या विरोधाच्या अनुषंगाने नागरिकांच्या शंका निरसन करण्यासाठी आज पन्हाळा येथे प्रशासनाचे वतीने बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच तास नागरिकांशी संवाद साधला होता. उत्सुकता ताणली गेली असल्याने एक हजार नागरिक उपस्थित होते.


नगरपरिषदेकडे लिखित प्रश्न सादर करण्यात आले होते. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारण्याची मुभा दिल्याने स्थानिक नागरिकांनी आपल्यावर, शहरावर गडांतर येण्याची भीती बोलून दाखवली.

कोणते बदल होणार ?

येडगे यांनी जागतिक वारसा स्थळामुळे पन्हाळगडावर आज रोजी लागू असलेल्या पुरात्त्वच्या नियमात बदल होणार नाही. येथील वस्ती व शासकीय कार्यालये हलवली जाणार नाहीत. ऐतिहासिक इमारती जवळील व्यवसाय नियमात बसत नसल्याने पर्यायी व्यवस्था केली जाईल. नागरिकांना विश्वासात न घेता गडावर कोणताही बदल केला जाणार नाही, असे आश्वस्त केले.

उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पुरातत्व संरक्षण सहायक बाबासाहेब जंगले, मुख्याधिकरी चेतनकुमार माळी, माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, दीपा काशीद, चंद्रकांत गवंडी, मिलिंद कुराडे, विशाल दुबुले, एम. डी. भोसले, तेजस्विनी गुरव, संभाजी गायकवाड, शरद शेडगे, आनंद जगताप उपस्थित होते.