नितीन बोंबाडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र- गुजरात राज्य सीमावाद चव्हाटय़ावर आल्याने तो सोडविण्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील यंत्रणेने नुकतीच प्रत्यक्ष सीमेवरील स्थळांची पाहणी केली असून तसा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला असल्याची माहिती तलासरी तहसीलदारांनी दिली आहे. दरम्यान, पालघर आणि बलसाड (गुजरात) जिल्हाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या संयुक्त मोजणीनंतरच सीमावाद मिटेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘महाराष्ट्राच्या हद्दीत गुजरातची घुसखोरी’ या मथळ्याखाली  सोमवारी  ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. महाराष्ट्र सीमेतील अतिक्रमणाची नेमकी माहिती घेण्यासाठी तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे  यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख यांची बैठक पार पडली. दुपारी ३.३० वाजता महसूल, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायतीकडून सीमास्थळ पाहणी करण्यात आली.

संयुक्त महाराष्ट्राच्या काळापासून राज्यमार्ग हद्दीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग देखभाल करीत आहे, अशी माहिती उपअभियंता राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

राज्यमार्गावरील ३०० मीटरचा खराब रस्त्याचा भूखंड गुजरातच्या आधिपत्याखाली असल्याचे चव्हाण यांनी या वेळी सांगितले, तर जिल्हाधिकारी पालघर यांचे आदेश येताच आपण महाराष्ट्र हद्दीची सीमानिश्चिती करू, असे तालुका भूमी अभिलेख अधिकारी, वडनेर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.  डहाणू प्रांत अमिषा मित्तल या सुटीवर असल्याने त्या सेवेत रुजू झाल्यावर त्यांच्याशी चर्चा करून  गुजरात-महाराष्ट्र हद्दीची  माहिती घेऊन त्याचा आढावा घेणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यनिर्मिती, मात्र सीमाप्रश्न कायम

संयुक्त महाराष्ट्राच्या काळात गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन्ही राज्य एकमेकांना जोडली होती. त्या वेळी सव्‍‌र्हे नं. १७३ आणि सव्‍‌र्हे नं. २०४ हे दोन्ही भूखंड लोकल बोर्ड, ठाणे यांच्या नावे होते. मात्र स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर सव्‍‌र्हे नं. १७३ चा भूखंड गुजरात राज्याकडे, तर सव्‍‌र्हे नं. २०४ महाराष्ट्र राज्याकडे विभागला गेला.  १७३ चा त्रिकोणी भूखंड तलासरी (महाराष्ट्र)- उंबरगाव (गुजरात) राज्यमार्गाला जोडला आहे.  यात तब्बल ३०० मीटरचा रस्ता गुजरात राज्याच्या देखरेखीखाली असून त्याच्या पुढचा रस्ता महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीत आहे.  त्रिकोणी भूखंडावर गुजरातच्या बलसाड पोलिसांचा तपासणी नाका आहे. उंबरगाव रेल्वे स्थानकाकडे जाताना महाराष्ट्रातील नागरिकांना तपासणी नाक्यावर अडवणूक केली जाते. उंबरगाव औद्योगिक वसाहतीमुळे सोलसुंभा (गुजरात) रहिवासी वस्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी सोलसुंभा ग्रामपंचायतीने  लगतच्या महाराष्ट्र राज्यातील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत तब्बल दीड किलोमीटर अतिक्रमण केल्याची वेवजी ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे हद्दीवरून वेवजी आणि सोमसुंभा ग्रामस्थांत वाद निर्माण होतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra gujarat border dispute to be resolved abn