नागपूर : नवीन शिक्षण नीती लिखित आणि मौखिक तयार झालेली आहे. पण अजून ती लागू व्हायची आहे. मात्र या नव्या धोरणातील शिक्षणाने इतका आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे की आपल्या मनगटाच्या बळावर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी स्वत:च्या पायावर उभा राहून शकेन, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत नागपूर शिक्षण मंडळ संचालित १५२ वर्ष पूर्ण झालेल्या दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाच्या गौरवशाली परंपरेवर आधारित माहितीपटाचे लोकार्पण सरसंघचालकांच्या उपस्थित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अशोक गांधी, सचिव डॉ. हरिश राठी , मुख्यध्यापिका अर्चना जैनाबादकर उपस्थित होते. दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाला १५० वर्षांचा इतिहास आहे. या शाळेचे आपले एक वेगळे धोरण आहे. ते आजतागायत जपले आहे. आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवळकर गुरुजी या शाळेचे माजी विद्यार्थी होते. डॉ. हेडगेवार यांचा ज्या शाळेशी संबंध आला ती प्राचीन असली आजही ती त्याच पद्धतीने सुरू आहे. शिक्षण हे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे असावे. ती व्यक्ती कुठेही गेली तरी टिकाव धरून कुटुंबाचे पालन-पोषण करू शकली पाहिजे. सरसंघचालकांनी या शाळेच्या शिक्षण पद्धतीचे कौतुक केले. याच शाळेमधून डॉ. हेडगेवारांपासून ते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शिक्षण घेतले. संघामधून डॉक्टर हेडगेवार यांचे नाव काढले तर संघ शून्य आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या नावातून संघ वगळला तर हेडगेवार शुन्य आहे. डॉ. हेडगेवार येथे शिकल्यामुळे या शाळेला महत्त्व आहे असेही डॉ. भागवत म्हणाले. या शाळेतून सार्थक जीवन जगणारे विद्यार्थी बाहेर पडले हे सांगता आले पाहिजे. असेच शिक्षण आणि संस्कार शाळेतून मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अशोक गांधी यांचे भाषण झाले. यावेळी माहितीपट तयार करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विभा गुंडलवार यांनी संचालन केले.