रत्नागिरी: स्थानिक बाजारपेठेत कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढुन सुध्दा आंबा अद्यापही सर्वसामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हापूस आंबा आवाक्यात येण्यासाठी सर्वसामन्यांना आणखी काही दिवसांची वाट  पहावी लागणार आहे. कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन यावर्षी घटले असताना देखील हापूस आंब्याची मुंबई, पुणे आणि इतर बाजारपेठांमध्ये आवक वाढली आहे. स्थानिक बाजार पेठेत देखील हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. मात्र या बाजार पेठांंमधील  आंब्याचे दर  मात्र सर्वसामान्य लोकांना न परवडणारे असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात वाढलेल्या उष्म्यामुळे आंबा लवकर तयार झाला  आहे. यामुळेच सर्व  बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली आहे. नवी मुंबईच्या वाशी बाजारपेठेत कोकणातून ८६ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. तरीही आंबा दरात घसरण झालेली नाही. मुंबईसह स्थानिक बाजार पेठेत आंबा  डझनला  ५०० ते १००० रुपये  दराने विक्री करण्यात येत आहे. काही ठिकाणी हापूस आंबा ५०० ते १२०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहे.कोकणात मार्च महीन्याच्या शेवटी पडलेल्या पावसामुळे हापूस आंब्याचे दर घसरण्याची शक्यता होती. मात्र वाढलेल्या उष्णतेमुळे आंबा लवकर तयार झाल्याने आंब्याची आवक वाढून देखील दर वरचढच राहिले आहेत. 

कोकणात या वर्षी आंबा उत्पादन कमी असले तरी  मार्च महिन्या पासून आवक चांगली सुरू झाली आहे. रत्नागिरीच्या स्थानिक  बाजारपेठेत हापूस आंब्या बरोबर पायरी व रायवळ आंबा विकला जात आहे. हापूस ५०० रुपयांपासून एक हजार रुपये डझन दराने विकण्यात येत आहे. पायरी आंबा ३०० ते ८०० रुपये डझन तसेच रायवळ २०० ते ५०० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत. हापूस आंब्याचे दर अद्यापही वरचढ राहिल्याने सर्व सामान्य लोकांना रायवळ आणि पायरी आंब्यावर समाधान मानावे लागत आहे.

मुंबई व पुण्यासारख्या बाजार पेठेत कोकणातील हापूस बरोबर  कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील हापूस, बदामी, लालबाग, बैगनपल्ली आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे.  हे आंबे ५० ते  १०० रुपये किलो दराने विकला जात आहे. मात्र कोकणातील हापूसची चव या आंब्यांना नसल्याने ग्राहकांकडून जास्त कोकणातील हापूसची मागणी होत आहे. मात्र स्थानिक बाजारपेठेसह इतर ठिकाणीही आंब्याचे दर जास्तच असल्याने सर्व सामान्य लोकांना हापूसची चव घेण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे.

हापूस आंबा खाण्यासाठी दर न परवडणारे असल्याने ते घेवू शकत नाही. मात्र दरवर्षी हापूस खाल्याशिवाय रहावत नाही. दर कमी झाल्यावर हापूस आंबा घेणे आम्हाला शक्य होईल. त्यामुळे दर कमी होण्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.- सतिश घाग, ग्राहक, रत्नागिरी</strong>