रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त फटका रस्त्यांना बसला आहे. या पावसाळ्यात जिल्ह्यातिल ४३९ रस्ते, पुल व साकवांची दुरावस्था झाली आहे. अंदाजे ८ लाख ६५६.८० रुपये एवढे रस्त्यांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे हा नुकसानिचा आकडा वाढण्याची शक्यता ही बांधकाम विभागाने वर्तविली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रस्ते, साकव, पूल आणि मोऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी राज्य शासनाकडून एकूण ११६ कोटी ३९ लाख ३९ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रत्नागिरी आणि चिपळूण बांधकाम विभागांकडून आणखी नुकसानाची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

मागी वर्षी पेक्षा या वर्षी जिल्ह्यात अधिक पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील आणि वाड्यांतील रस्त्यांची दुरावस्था होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे, गोठे, साकव, मोऱ्या तसेच पूल यांचेही नुकसान झाले आहे. साकव, पूल आणि मोऱ्यांच्या नुकसानग्रस्ततेमुळे जिल्ह्यातील वाहतूकही प्रभावित झाली आहे. यामुळे नुकसानग्रस्त रस्ते, पूल, मोऱ्या आणि साकव यांच्या दुरुस्तीकरिता आवश्यक निधीचा एकत्र प्रस्ताव तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा मार्फत सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ४३९ रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्याचबरोबर ७२ साकव आणि ६९ मोऱ्या व पुलांचे नुकसान झाले आहे. यांना दुरुस्त करण्यासाठी ११६ कोटी ३९ लाख ८० हजार रुपयांची आवश्यकता आहे. मात्र,संपूर्ण नुकसानाची माहिती जमविण्यासाठी काही दिवस वेळ लागणार असल्याने त्यानंतर एकूण झालेल्या नुकसानाचा आकडा तयार करून संबंधित प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला जाणार आहे.
जिल्ह्यात पावसामुळे नादुरुस्त झालेल्या साकव, पुल व रस्त्यांसाठी राज्य शासनाने दुरुस्ती आणि पुनर्बाधकामासाठी वेळेवर निधी देणे गरजेचे बनले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी मध्ये ४३९ रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांचे आता पर्यत ८ लाख ६५६.८० रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पावसाने ६९ पूल व मोऱ्यांचे १ लाख २५३ रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच ७२ साकवाचे १ लाख ७३० असे एकूण ५८० साकव , पुल व रस्त्यांचे ११ लाख ६३९.८० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी बांधकाम विभागाचे ४ लाख ४६६.३५ रुपयांचे नुकसान झाले तर चिपळूण बांधकाम विभागाचे ७ लाख १७३.४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.