सावंतवाडीच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मोती तलावात सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून बसवण्यात आलेला संगीत कारंजा लवकरच पूर्णवेळ पर्यटकांसाठी खुला होणार आहे. सध्या तरी हा कारंजा कायमस्वरूपी कधी सुरू होईल याची निश्चित तारीख ठरलेली नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कारंजाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.

माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला आहे. या संगीत कारंज्यामुळे मोती तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडली असून, सावंतवाडी शहरातील पर्यटन वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा कारंजा सुरू केला जातो, तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते. संगीत आणि पाण्याचे मनमोहक प्रदर्शन पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतील, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. कारंजा पूर्णवेळ सुरू झाल्यावर विविध गाण्यांच्या तालावर पाण्याचे नयनरम्य खेळ मोती तलावाच्या काठावर अनुभवता येणार आहेत. यामुळे सावंतवाडीच्या पर्यटन विकासाला आणखी चालना मिळेल अशी आशा आहे.

सध्या तरी सावंतवाडीकरांना आणि पर्यटकांना या आकर्षक संगीत कारंजाच्या पूर्णवेळी उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.