२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस आठवला तरी अनेक मुंबईकरांच्या उरात धडकी भरते. कारण आजच्याच दिवशी पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या काही माथेफिरू दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. गोळीबार आणि बॉम्बस्फोटानं संपूर्ण मुंबई शहर हादरलं होतं. नागरिकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतलं होतं. सर्वत्र पोलिसांच्या हालचाली सुरू होत्या. बाहेर काय घडतंय? याबाबत अनेकांच्या मनात धाकधूक होती. या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले होते. मृतांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्याच्या जखमा आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईवर चाल करून आलेल्या दहशतवाद्यांचा सामना करताना मुंबई पोलीस दलातील अनेक जवान शहीद झाले. हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटेंसारख्या धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्यांनाही वीरमरण आलं. देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या अधिकाऱ्यांबाबत लोकांच्या मनात आजही प्रेम आणि आदर कायम आहे. पण एकेकाळी गुन्हेगारी विश्वामध्ये या अधिकाऱ्यांची कमालीची दहशत होती. संबंधित अधिकाऱ्यांचं नाव जरी ऐकलं तरी गुन्हेगार थरथर कापायचे. यामध्ये आयपीएस अधिकारी अशोक कामटे सर्वात पुढे होते. सोलापूरमधील राजकीय गुंडगिरी आणि गुन्हेगारी मोडून काढण्याचं श्रेय अशोक कामटेंना दिलं जातं. यांच्या धाडसाचे अनेक किस्से सांगितले जातात.

आणखी वाचा- Mumbai 26/11 Attacks: ‘त्यादिवशी माझा पुनर्जन्मच झाला, त्या आठवणी कधीच विसरू शकत नाही’

२००७ साली अशोक कामटे हे सोलापूरचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी त्यांनी एका अपक्ष आमदाराला धक्के मारत अटक केली होती. रविकांत पाटील असं या आमदाराचं नाव. ते कर्नाटकातील इंडीचे आमदार होते. रविकांत पाटील हे कर्नाटकचे आमदार असले तरी सोलापूर परिसरात त्यांची मोठी राजकीय ताकद होती. असं असताना अशोक आमटे यांनी कसलाही विचार न करता रविकांत पाटील यांच्या कॉलरला पकडून त्यांना फरपटत नेत पोलिसांच्या वाहनात बसवलं होतं. अशोक कामटे यांच्या या कृत्याचे महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनातही पडसाद उमटले. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपा-शिवसेनेनं अशोक कामटे यांच्यावर हक्कभंग दाखल करून त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. याबाबतची एक आठवण महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आरआर पाटील यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे.

१६ ऑगस्ट २००७ रोजी कर्नाटकच्या इंडीचे अपक्ष आमदार रविकांत पाटील यांचा ५० वा वाढदिवस होता. आमदारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी रात्री दोनच्या सुमारास फटाके फोडायला सुरुवात केली. संपूर्ण शहर शांत झोपलं असता आमदारांच्या बंगल्यावर फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. फटाक्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यावेळी गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आमदार महाशयांना आणि कार्यकर्त्यांना फटाके वाजवण्यापासून मज्जाव केला. तसेच रात्री १० नंतर फटाके फोडण्यास बंदी आहे, या नियमाची आठवण करून दिली. पण आमदारकी डोक्यात शिरलेल्या रविकांत पाटलांनी दादागिरी करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरच हात टाकला आणि त्यांचा शर्ट फाडला.

आणखी वाचा: विशेष लेख : कसाब म्हणाला, ‘कैसी हो मॅडम?’

यानंतर संबंधित पोलीस निरीक्षक शर्ट फाडलेल्या अवस्थेत रात्री दोन वाजता सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्याकडे गेले. घडलेला प्रकार पाहिल्यानंतर अशोक कामटेंना राग येणं स्वाभाविक होतं. केवळ कायद्याचं पालन करा, असं सरळ सांगितल्यावर एखादा व्यक्ती आमदारकीच्या जोरावर पोलीस अधिकाऱ्यावर हात टाकत असेल, तर मी त्यांना जाब विचारला पाहिजे, असं ठरवून अशोक कामटे आमदारांना अटक करण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले. पण यावेळी आमदार महोदयांनी अशोक कामटे यांच्याबरोबरही बाचाबाची आणि धक्काबुक्की करायला सुरुवात केली.

यानंतर संताप अनावर झालेल्या अशोक कामटे यांनी पोलिसी खाक्या दाखवत आमदाराला धक्के देत रात्री दोनच्या सुमारास अटक केली. याच काळात नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. तेव्हाच्या विरोधीपक्षाने हे प्रकरण लावून धरलं आणि विधानसभेत गोंधळ घातला. कर्नाटकच्या आमदाराचा हक्कभंग महाराष्ट्राच्या विधानसभेत दाखल झाला. अनेकांनी टीकेची झोड उठवली. सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. विरोधी पक्षाने अशोक कामटेंच्या निलंबनाची मागणी केली, असा प्रसंग आरआर पाटील यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special story of ashok kamte who martyr heroically in 26 11 mumbai terrorist attack arrested mla ravikant patil rmm