तलवारी सारख्या धारदार शस्त्राने वाढदिवसाच्या केक कापून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुन्हा केला आहे. त्याबद्दल त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने शनिवारी लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. या निमित्ताने शिवसेनेच्या दोन गटातील वाद उफाळला असल्याचे दिसून येत आहे. हेही वाचा- कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यातील एसटी सेवा विस्कळीत; प्रवाशांची गैरसोय कोल्हापूरसारख्या शांतताप्रिय शहरात वाढदिवसानिमित्त गुन्हेगारीला चालना देण्याचे, दहशत माजवण्याचे काम राजेश क्षीरसागर यांनी केल्याचे दिसून येत आहे. शहरात बेकायदेशीर फलक लागले आहेत. त्यावर गुन्हेगारांची प्रतिमा आहे. वाढदिनी सायंकाळी राजेश क्षीरसागर व त्यांचे कार्यकर्ते धारदार तलवारीने केक कापत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमात अग्रेषित झाले आहेत. त्यामुळे भारतीय हत्या अधिनियम कायदा प्रमाणे त्यांनी गुन्हा केलेला आहे. तलवार सारखे शस्त्र बाळगणे शिक्षेस पात्र ठरते, असे निवेदनात नमूद केले आहे. हेही वाचा- VIDEO: “ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर…”, जिजाऊंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल बेकायदेशीर फलक लावून महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याप्रमाणे गुन्हा केला आहे. त्यामुळे क्षीरसागर यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले व सहकार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.