एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोवर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. आमचा पक्ष आहे, पक्षाचं भलं कुठे होतंय, त्यानुसार विचार केला जाईल, असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी दिला. यावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बच्चू कडू यांच्यासाठी विचार करू असं म्हणत असतानाच महायुती सरकारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हे प्रकरण आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणीसाठी गेलं आहे. १६ आमदार अपात्रप्रकरणी राहुल नार्वेकर १० जानेवारी रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. यावरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. १० जानेवारीच्या सुनावणीत १६ आमदार अपात्रच होतील, असा दावा विरोधकांनी केला असून मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चांनाही पुन्हा एकदा जोर आला आहे. तसंच, मुख्यमंत्री बदलले तर महायुती सोडण्याचा विचार करू असं बच्चू कडूही म्हणाले आहेत. याबाबत विजय वडेट्टीवारांना विचारलं असता ते म्हणाले, “बच्चू कडू काय म्हणतात ते पुढच्या काळात ठरेल. ते चांगेल मंत्री होते. परंतु तिकडे (शिंदे गटात) गेले. त्यामुळे तेही (मंत्रीपद)गेलं अन् हेही गेलं. त्यांची महाविकास आघाडीत येण्याची तयारी असेल आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा करू आणि हायकमांडच्याही कानावर टाकू. बच्चू कडूंची तयारी असेल तर चर्चा करायला तयार आहेत. त्यांच्या पक्षाचं भलं कुठे आहे ते त्यांना कळलं असे.” विजय वडेट्टीवार टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा >> “एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत…”, बच्चू कडूंचं मोठं विधान; काय असेल महायुतीचं भवितव्य?

तसंच, १० जानेवारीला मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले, पुढच्या दहा तारखेनंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहे, अशी आमची माहिती आहे. ते आता नवरदेव कोण आहेत, हे १० तारखेच्या निकालानंतर कळेल. त्यामुळे बच्चू कडूंना अंदाज आला असेल की आता मंडपही बदलतोय आणि नवरदेवही बदलतोय. त्यामुळे काही खरं नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदावरून पायउतार झाल्यानंतर ती संधी अजित पवारांना मिळणार का? असं विचारलं असता विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून अनेकजण तयार आहेत. पण मला वाटतं की नवीन नवरदेव तयार आहेत.”

१० जानेवारी रोजी अंतिम निकाल लागणार?

आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, त्याहून अधिक मुदत दिली जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वेळी ठाकरे गटाच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीमध्ये बजावले होते. अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या मुदतीमध्ये पूर्ण होऊ शकेल. मात्र, लेखी आदेशासाठी तीन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची विनंती विधिमंडळाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने फक्त दहा दिवसांची मुदतवाढ देत १० जानेवारी रोजी निकाल देण्यास सांगितले.

शिवसेनेच्या फुटीवर ११ मे २०२३ रोजी घटनापीठाने दिलेल्या निकालामध्ये आमदारांच्या अपात्रतेवर निर्धारित वेळेत निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाचे पालन होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची याचिका ठाकरे गटाने दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यावर गेल्या वेळी झालेल्या सुनावणीमध्ये विधानसभाध्यक्षांनी डिसेंबरअखेर निर्णय द्यावा. विधानसभाध्यक्षांना दिलेली ही शेवटची संधी असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There will be new cm again after 10 january says opposition leader vijay wadettiwar sgk