अजित पवारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र, मंत्रीपदाची शपथ घेऊनही अद्याप खातेवाटपाचा प्रश्न कायम आहे. यासाठी बुधवारी (१२ जुलै) अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी दिल्ली दौरा करत अमित शाहांची भेटही घेतली. आता याच मुद्द्यावर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय वडेट्टीवार म्हणाले, “पूर्वी तीन पक्षाचं सरकार होतं. त्याला तीन पक्षाची रिक्षा म्हणत होते. ही रिक्षा संकटावर मात करून अडीच वर्षे लोकांची व्यवस्थित सेवा करत होती. आता या तीन पक्षाच्या सरकारला रिक्षा म्हणायचं की, तीन चाकी घसरगाडी म्हणायचं? या तीन चाकी सरकारचा पहिला टायर कधी पंक्चर होतो याची लोक वाट पाहत आहेत. पुढचा टायर पंक्चर होऊनही गाडी पळवण्याचं काम सुरू आहे.”

“सत्तेसाठी इतका हावरटपणा उभ्या महाराष्ट्राने कधीही पाहिला नव्हता”

“सत्तेसाठी इतका हावरटपणा उभ्या महाराष्ट्राने कधीही पाहिला नव्हता. तो हावरटपणा आज महाराष्ट्राच्या जनतेला बघायला मिळत आहे. मला अनेकांनी सांगितलं की, आता मतदानाला जाण्यासाठी इच्छाही राहिली नाही. लोकांची भावना आणि प्रतिक्रियेवरून महाराष्ट्रातील राजकारण्यांना थोडी लाज वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली.

हेही वाचा : “जो माणूस इथं राजा म्हणून राहत होता, तो दिल्लीला…”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला

“अशा राजकारण्यांची जिरवायची लोक वाट बघत आहेत”

“खरंतर अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. विकासाच्या नावावर सरकार आणायचं आणि वास्तवात विकास कामं बंद पाडायची असं सुरू आहे. सध्या सतेच्या मलिद्यासाठी भांडण सुरू आहे. हा लज्जास्पद प्रकार महाराष्ट्रातील जनता बघत आहे. अशा राजकारण्यांची कशी जिरवायची याची लोक वाट बघत आहेत,” असंही विडय वडेट्टीवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar criticize shinde fadnavis pawar government pbs