अलिबाग – दरवर्षी जून महिन्यात सुरू होणाऱ्या पावसाने या वर्षी २० मेपासूनच संततधार कोसळण्यास सुरुवात केली आहे. या पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ४१ वाड्या आणि २३८ वाड्यांना ४० टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, आठवडाभर कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात आली असून, टँकरने करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गेल्यावर्षी काही गावांना ३० जून पर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षी महिनाभर आधीच टँकर बंद करण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या लवकर आलेल्या पावसाने धरणांच्या जलसाठ्यात ११ टक्क्याची वाढ झाली आहे.

या वर्षी लोकांना उन्हाळ्याची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवली. मे महिन्यात विहिरी, नाले, तलाव, बोअरवेल कोरड्या पडल्या होत्या. पाणीपुरवठा गावोगावी योजना राबवण्यात आल्या असल्या तरी पाणीटंचाईची समस्या संपलेली नाही. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. टंचाईग्रस्त भागात टँकरच्या माध्यमातून ११२ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने १५ जूनपर्यंत टँकर अधिग्रहित केले होते. मात्र, आठवडाभरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे विहिरी, तलाव, नाल्यातील पाणीपातळी वाढू लागली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी झाली आहे.

पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. पारंपारीक जलस्‍त्रोतांमध्‍येही पाणीसाठा झाला आहे. त्‍यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्‍याने प्‍यायचे कसे असा प्रश्‍न नागरीकांना पडला आहे. हे पाणी गाळून उकळून प्‍यावे लागत आहे. तर काहींनी इतर कामासाठी हे पाणी वापरून पिण्‍यासाठी जारचे पाणी विकत घेणे कायम ठेवले आहे.

धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

पावसामुळे जिल्‍ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. २१ मे पर्यंत २८ धरणांमधील पाणीसाठा २७ टक्‍के इतका होता. यातील सात धरणांमध्‍ये केवळ १० टक्‍के पाणी शिल्‍लक होते. आठवडाभर झालेल्‍या पावसाने धरणातील जलसाठ्यात ११ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.रोह्यातील सुतारवाडी धरण पूर्ण भरले आहे. मे महिना संपेपर्यंत पाणी टंचाईचे ढग अधिक गडद होण्‍याची भती व्‍यक्‍त केली जात होती. परंतु पावसाने लवकर हजेरी लावल्‍याने जलचिंता बऱ्याचअंशी मिटली आहे. २० मे पासून आतापर्यंत जिल्‍ह्यात पाऊस कोसळतो आहे. आधी अवकाळी, नंतर मान्‍सूनपूर्व आणि त्‍यानंतर मान्‍सूचा पाऊस मे‍ महिन्‍यातच बरसला. जिल्‍ह्यात आतापर्यंत सरासरी ५०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील अनेक दिवसांचा पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करणे थांबवले आहे; जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी बोलूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या असेल त्या गावांत पुन्हा टैंकर पुरवठा करण्यात येईल.- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा

प्रमुख धरणातील पाणीसाठा

धरण           पाणीसाठा (टक्‍के )

फणसाड          १०

वावे              २०

सुतारवाडी         ५३

कवेळे            १

कार्ले             १५

कुडकी            १७

पाभरे            ४७

वरंध            १९

खिंडवाडी         १९

खैरे             २८