प्रत्येकाच्या सर्जनशील मनाचा एक प्रवास असतो. तुमचा कधी सुरू झाला आणि कसा?

माझं बालपण ऑस्ट्रेलियामध्ये गेलं. मला कोणी भावंडं नव्हतं. आईलाही कोणी भाऊ-बहीण नव्हते. म्हणजे मामा-मावशी अशी नाती नव्हती, पण लहानपणी एक ‘डुल्या’ घोडा होता. त्यावर मी तासन् तास बसून असायचे. तेव्हा ऐकलेल्या गोष्टी, डिस्नीचे कार्टून, चार्ली चॅप्लिनचे चित्रपट असं खूप पाहता आलं. खूप सारी पुस्तकं आई आणि अप्पांनी आणून दिली होती. ती पुस्तकं, चित्रपट आणि डुल्या घोडा यातून माझ्या मनात ‘पटकथा’ तयार झाल्या असाव्यात. राजपुत्र, राजकन्या, राक्षस अशी पात्रं त्यात होती. त्या वेळच्या कल्पनाविश्वातील सगळेजण माझ्याशी बोलत. म्हणजे वाघ, सिंह यांसह सारे जंगली प्राणीही त्यात होते. तिथे हा प्रवास सुरू झाला असावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच काळात अच्युत रानडे हे आमच्या घरी येत. तो खूप उमदा माणूस होता. तो सिनेमाच्या गोष्टी सांगायचा. म्हणजे तंत्राच्या अंगाने नाही, पण त्यांची गोष्ट जणू एक फ्रेम असायची. म्हणजे वरच्या बाजूने किंवा ढगातून एक गाव बघतो आहोत. त्यात खूप छोटी घरं दिसतात. त्याच गावात जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलगाडीची चाकं आधी दिसतात आणि मग त्याचे पाय आणि चेहरा. मग तो उतरतो. त्याची झोपडी दिसते. मग तो आत जातो अशी चित्रात्मक गोष्ट ऐकल्यामुळे चित्रपटासाठी आवश्यक असणारं मन तयार झालं असावं. तेव्हा असं काही नव्हतं, की ही जरा सिनेमाच्या वाटेने जाईल वगैरे… पण निश्चितच याचा प्रभाव पडला.

हेही वाचा : राज बब्बर यांच्या कुटुंबाला करायचं होतं मुस्लीम नादिराचं धर्मांतर; मुलीचा खुलासा, म्हणाली, “फक्त एका ख्रिश्चन…”

एखाद्या प्रसंगाचा प्रभाव असतो, संवेदनशील मनावर तर असा काही होता का?

आपण काही तरी चित्रपटात करू, असं जेव्हा ठरलं ना तेव्हा ‘राम जोशी’ नावाचा चित्रपट गाजत होता. जयराम शिलेदार आणि हंसा वाडकर यांचा चित्रपट होता. तेव्हा अच्युत रानडे यांनी फर्ग्युसनजवळच्या टेकडीवरून जाताना एक गोष्ट सांगितली मला. चित्रपटात राम जोशी दारूच्या आहारी गेल्याचे प्रसंग होते, त्यामुळे त्याच्या कलेवर परिणाम होऊ लागला होता. परिणामी तो एका महिलेकडून हरला. त्यानंतर अत्यंत विषण्ण मनाने त्याने ‘आजपासून दारू सोडली’ असं जाहीर केलं. दारू सोडली तर खरी, पण तो अस्वस्थ होता. रात्रीच्या वेळची ती अस्वस्थता होती. त्या प्रसंगात त्याचे नुसते पाय दिसतात. धोतर असं मागून लोळतं आहे आणि तो नुसत्या येरझाऱ्या मारतो आहे. आणि होतं असं की त्याच्या धोतराच्या सोग्यात सुरईचं टोक अडकतं आणि ती सुरई त्याच्या मागे फरपटत जाते, असं चित्रण होतं. तेव्हा त्याची दारू सुटली नाही, हे मला कळलं. रानडेही म्हणाले, तुला बरोबर कळलं आहे. पुढे हा चित्रपट मी पाहिला, पण सांगितलेल्या गोष्टीमुळे तो प्रसंग बहारदार वाटला. एकूण चित्रपट पाहताना तशी काही मजा नाही आली. मला वाटतं, माझ्यातला दिग्दर्शक तेव्हा जागा झाला होता. तेव्हाच हा असा सर्जनशील मनाचा प्रवास सुरू झाला.

पुढचा प्रवास कसा होता?

पुढे मग आकाशवाणीमध्ये काम करायला लागले. तेव्हा बालोद्यानसाठी काम करू लागले. नभोनाट्य करू लागले, पण त्याचा एकच प्रयोग व्हायचा. रेडिओ सप्ताहमध्ये एकच प्रयोग करणाऱ्या मुलांचा हिरमोड व्हायचा. खूप मेहनत करून एवढाच प्रयोग कसा, असे व्हायचे. पालकही तेच म्हणू लागले. मग पुढे मुलांचं नाटक या दालनातही काम केलं. आणि मग ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश मिळाला. पुढे फिल्म इन्स्टिट्यूटमध्येही नोकरी मिळाली. तिथे अभिनय आणि संभाषण शिकवायला जात असे. त्यामुळे तिथे गेल्यावर मग कळलं की आपल्याला चित्रपटातच काही तरी करायचं आहे, कारण फिल्म इन्स्टिट्यूटचे ग्रंथालय खूप चांगलं होतं. तिथे खूप तांत्रिक वाचून घेतलं. त्यानंतर मोठ्या दिग्दर्शकांची चरित्रं वाचली. अॅन्टोनिओनीपासून अनेकांची… त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यांनी त्यावर कशी मात केली, त्याचा पहिला चित्रपट कोणता, त्यांचा प्रवास अशी सारी माहिती मिळवत राहिले. यात सत्यजित रेही आले.

हेही वाचा : गायक दर्शन रावलने बेस्ट फ्रेंडशी बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

या काळात खूप सशक्त संहिता वाचता आल्या. तिथे परिपूर्ण अभ्यास झाला. तिथे शिकवत होते आणि शिकतही होते. तिथे स्वत:शी संवाद वाढला. अनेक पुस्तकं, माणसं, प्रसंग यातून घडत राहिले. दूरचित्रवाहिनीवर काम करताना नाटक जोरात सुरू झालं होतं. मुलांची नाटकं लिहिली आणि मग मोठ्यांची नाटकं लिहिली. कधी तरी काही दिसतं, सापडतं. त्याप्रमाणे दूरदर्शनमध्ये असताना आग्रा-दिल्ली रस्त्यावर एका बाईची गोष्ट सांगितली गेली. तिची एक टपरी होती. ती बाई चहाची टपरी चालवते. त्या टपरीवर हमरस्त्यावरचे सारे ट्रक ड्रायव्हर थांबतात, असं कळलं. पंजाबमधून येणारे, सहा फुटांची उंची. सारे जण आल्यानंतरही ही छोट्या चणीची बाई काही चावटपणा चालू द्यायची नाही. हा स्त्रीमुक्तीचा संदेश देत होती. तेव्हा तिच्यावर एक सिनेमा केला ११ मिनिटांचा. त्या सिनेमाला मला पहिलं पारितोषिक मिळालं. तो पहिला सिनेमा. तेव्हा तो दिग्दर्शक होण्याचा किडा चावला.

हा खेळ आहे हे कळायला लागलं. मग खूप टेलिफिल्म केल्या. ‘स्पर्श’ चित्रपटाची पहिली फिल्म केली होती ‘रैना बीत जाये’ या नावाने. ‘धुआँ धुआँ’ ही ‘चष्मेबद्दूर’ची टेलिफिल्मही बनवली. आणि मग हे आपल्याला जमतंय असं लक्षात आलं. खूप विचार येतात. खूप प्रसंग असतात. काही विरून जातात, काहींना वाचा फुटते…

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film director sai paranjpye interview loksatta at ajanta ellora international film festival css