या चित्रपटाची केवढी तरी वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे ती या चित्रपटाच्या कथेच्या ओघात आहेत. आज हे कथासूत्र कदाचित फारसे दमदार वाटणार नाही. पण त्या काळात ते सामाजिकदृष्ट्या खूपच चर्चेचे ठरले. एका गरीब माता-पित्याच्या ( शरद तळवळकर व अलका इनामदार) कन्येचा ( अलका कुबल) विवाह एका श्रीमंत युवकाशी ( महेश कोठारे) होतो. या युवतीचा भाऊ ( लक्ष्मीकांत बेर्डे) वगैरे कुटुंबिय खूप चांगला आशिर्वाद देतात. पण… सासरी पाऊल टाकल्यापासूनच कजाग, कपटी सासू ( शशिकला) या सूनेचा फारच छळ करु लागते. दुर्दैवाने या सोशिक नायिकेचा नवरा देखील हुंड्यासाठी प्रचंड प्रमाणात छळ सुरु करतो. नायिकेचा गरीब पिता पैसे आणणार कोठून? हा छळ वाढत वाढत जातो व नवरा आणि सासू ( ती विधवा असते) या नायिकेला चक्क जाळतात.
समाजात अशा घटना कुठेना कुठे होतच असतात त्यातीलच ही एक. त्यामुळेच या चित्रपटाला पुणे शहरातील प्रभात चित्रपटगृहात रौप्य महोत्सवी यश लाभले यात आश्चर्य ते काय? या चित्रपटाच्या प्रीमियरची पार्टी लग्नाच्या हॉलमध्ये ठेवल्याचे आठवतयं. ( येथे निर्माता दिसतो म्हणूयात). या चित्रपटाची वैशिष्ट्ये म्हणजे, शशिकलाने खूपच दिवसांनी मराठी चित्रपटात भूमिका साकारली. महेश कोठारेने जणू खलनायक साकारला. अलका कुबलला या चित्रपटाने पहिले यश मिळवून दिले व पारंपरिक नायिका अशी ओळख दिली. लक्ष्मीकांत बेर्डे, सविता प्रभुणे यांनाही या चित्रपटाने प्रकाशात आणले. सर्वच कलाकारांसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरला. चित्रपटाच्या जगात यशच महत्त्वाचे असते, ते हे असे.
त्या काळात मराठीत प्रामुख्याने अशाच सामाजिक कौटुंबिक चित्रपटांची चलती होती. जोडीला ग्रामीण व विनोदी चित्रपट बनत. पण याच चित्रपटांनी मराठी चित्रपट जगवला-रुजवला त्याचीच गोड फळे आज मिळताहेत. ‘लेक चालली सासरला’ हे केवळ चित्रपटाचे नावच नव्हे तर त्या काळातील मराठी चित्रपटाची ती एक महत्त्वपूर्ण ओळख होती. चित्रपटातील गाणी अण्णासाहेब देउळगावकर यांची होती, तर संगीत राम-लक्ष्मण यांचे होते.
दिलीप ठाकूर