मुंबई : राज्य पोलीस दलात १५ हजार शिपायांची भरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. २०२४-२५ पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबरोबरच २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळ विशेष बाब म्हणून अर्ज करून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी देण्यास मंजुरी देण्यात आली.
करोनामुळे पोलीस शिपायांची भरती होऊ शकली नव्हती. दोन-तीन वर्षे भरती न झाल्याने आणि या कालखंडात हजारो कर्मचारी निवृत्त झाल्याने पोलीस शिपायांचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा राज्य सुरक्षा महामंडळाकडून हंगामी किंवा तात्पुरत्या स्वरूपातही पोलीस शिपाई घेण्यात आले होते. आता राज्य सरकारकडून नियमित पोलीस भरतीला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्य पोलीस दलातील शिपायांची २०२४ मध्ये रिक्त असलेली आणि २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे.
भरतीसाठी अर्ज मागविणे, अर्जांची छाननी प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखीपरीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार हे प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.