घाटकोपर येथून बेपत्ता असलेल्या अर्जुन टेंबकर (२१) या तरुणाच्या हत्येप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी त्याच्या तीन मित्रांना अटक केली आहे. सोमवारी कांजूर येथील पूर्व द्रुतगती महामार्गावरील गटारात त्याचा मृतदेह आढळला होता. पिकनिकच्या पैशांवरून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
अर्जुन टेंबकर मित्रांसमवेत ठाण्याच्या टिकुजिनीवाडी येथे पिकनिकला जाण्यासाठी निघाला होता. गाडीमध्ये त्याचे मित्रांसमेवत भांडण झाले. पिकनिकला जाण्यासाठी भाडय़ाने घेतलेल्या गाडीच्या पैशांवरून वाद होऊन भांडण झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रविवारी तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. याप्रकरणी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले असून, अन्य तिघे फरार आहेत. या दोघांना विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे घाटकोपर पोलिसांनी सांगितले. चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पिकनिकच्या पैशावरील वाद तसेच प्रेमप्रकरणाची शक्यताही पोलीस तपासून पाहात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College students killed over picnic money dispute