समाजप्रबोधनाचा वसा घेऊन कार्यरत असलेल्या गणेशोत्सव मंडळांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांना पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी पाच कोटी रुपयांची केलेली तरतूद दुष्काळग्रस्तांसाठी द्यावेत, अशी मागणी गणेशमंडळांकडून पुढे येत आहे. या मागणीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवारी ठाकूरद्वार येथे गणेशमंडळांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आतापर्यंत गणेशमंडळांनी विविध मार्गानी ३.५ कोटी रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी दिला आहे.
राज्यात सलग दुसऱ्या वर्षी भीषण दुष्काळ पडला असून पाण्याच्या थेंबासाठी हजारो नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. राज्य सरकारने दुष्काळावर उपाय म्हणून जलयुक्त शिवार योजना ही दीर्घकालीन तर सांगलीहून लातूर, मराठवाडय़ात पाणी नेण्याचे तत्कालिक उपाय सुरु केले आहेत. नाम सारख्या अनेक स्वयंसेवी संस्थांनीही यात पुढाकार घेतला असून कुठल्याही संकटात धावून जाणाऱ्या गणेशमंडळांनीही यात आपला वाटा वेगळ्या प्रकारे देण्याचे ठरविले आहे. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने गणेशोत्सवादरम्यान राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. मात्र, राज्यातील गणेशमंडळ यंदाच्या वर्षीसाठी असलेला निधी दुष्काळग्रस्तांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी वापरावा, या प्रयत्नात आहेत.
याविषयी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांना विचारले असता, अनेक गणेशमंडळांची दुष्काळग्रस्तांना आतापर्यंत विविध मार्गानी मदत केली आहे. राज्य सरकारपासून स्वयंसेवी संस्था मिळून आतापर्यंत ३.५ कोटी रुपयांची मदत गणेशमंडळांनी स्वत केली आहे. दुष्काळग्रस्त बांधवांना अधिक मदत कशी करता येईल, असा विचार सुरु असताना सरकारने यंदाच्या वर्षी राखून ठेवलेला पाच कोटी रुपयांचा निधी दुष्काळ निवारण्याच्या कामासाठी वापरण्यास द्यावा, अशी भावना गणेशमंडळांमध्ये निर्माण झाली आहे. त्यावरच शनिवारी अंतिम निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील प्रमुख गणेशमंडळांच्या प्रतिनिधींची आज, शनिवारी ठाकूरद्वार येथील प्रभू सेमिनरी स्कूल येथे सायंकाळी सहा वाजता मंडळांची बैठक बोलावण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati mandals help for drought people