पनवेल तालुक्यातील शिरवली गावाजवळच्या पाटील फार्महाऊसवर दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेली चार ग्रामस्थांची हत्या ही काळ्या जादूने पैशाचा पाऊस पाडण्याच्या प्रकरणातून झाल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा दावा असून पोलिसांनी मात्र ही हत्या जमिनीच्या व्यवहारातून झाल्याचे सांगितले.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रेय पाटील यांचा शिरवली गावात फार्महाऊस आहे. रविवारी (११ नोव्हेंबर) पाटील यांचा पुतण्या रामदास धर्मा पाटील याने काकांकडून फार्महाऊसची जमिनीच्या एका बैठकीसाठी चावी घेतली.
तीन दिवस झाले तरी चावी परत आणून न दिल्याने पाटील यांनी बुधवारी फार्महाऊस गाठले. त्यावेळी फार्महाऊसच्या बाहेर त्यांना चार मृतदेह आढळले. हे मृतदेह रामदास पाटील, बाळाराम टोपले, प्रीतम घरत, आणि नितिन जोशी यांचे होते. यात जोशी हा काळी जादू जाणणारा मांत्रिक असल्याचे समजते. बुधवारी असणाऱ्या अमावास्येच्या निमित्ताने या ठिकाणी पैशांचा पाऊस पाडला जाणार होता असे समजते. बाळाराम पाटील यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता तर तीन जणांना दगडाने ठेचून मारण्यात आले होते.
या ठिकाणी पोलिसांना १२ मोबाईल सीमकार्ड मिळाले आहेत. त्यामुळे या गुन्ह्य़ाचा छडा लवकरच लागेल असा पोलिसांना विश्वास आहे. ही हत्या जमिनीच्याच व्यवहारातून झाली असावी असा अंदाज पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी व्यक्त केला. संपूर्ण परिसर आज शोकाकूल असल्याने कोणतीही चौकशी करण्यात आली नाही असेही ते म्हणाले. दरम्यान स्थानिक पोलिसांनी आज परिसरातील चार प्रॉपर्टी डीलर्सना ताब्यात घेतले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money matter is the reason of form house murder