शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ शब्द वापरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रधान सचिवांना दिले. याबाबत राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तसे लेखी निर्देश महिला व बालविकास विभागाला दिले. या निर्णयामुळे विधवा महिलांचा सन्मान वाढेल, असा दावा मंत्री लोढा यांनी केला. यानंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही गुरुवारी (१३ एप्रिल) ट्वीट करत यावर प्रतिक्रिया दिली.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ (गं.भा.) हा शब्द वापरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्याबद्दल त्यांचे मनपुर्वक आभार. पतीचे निधन झाल्यानंतर महिलेला विधवा न संबोधता सन्मानजनक पर्यायी शब्द वापरावा अशी शिफारस सर्वप्रथम राज्य महिला आयोगाने केली होती. पतीचे निधन झाल्यानंतर महिलेला विधवा संबोधण्यात येते. हा शब्द महिलांचा अपमान करणारा त्यांचे मनोबल खच्ची करणारा असल्याची भावना जनमानसात आहे.”
हेही वाचा : ‘गंगा भागिरथी’ म्हणत २१ व्या शतकातील महिलांना पुन्हा पुरातन काळात नेण्याचा प्रयत्न का?
“विधवा शब्दाला पर्याय म्हणून ‘पुर्णांगी’ शब्द वापरावा अशी शिफारस आयोगाने शासनाकडे केली होती. राज्य महिला आयोगाची अध्यक्षा या नात्याने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात या शिफारसीबाबत घोषणा केल्यानंतर उपस्थित शेकडो महिलांनी हात उंचावत याला पाठिंबा दिला होता. आयोगाच्या या शिफारसीचा संवेदशीलतेने विचार करत महिलांना सन्मान मिळवून देणारा सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मंत्री महोदयांचे अभिनंदन. पुरोगामी महाराष्ट्राचा हा निर्णय महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण यात मोलाचा ठरेल अशी आशा आहे,” असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं.