अभिनेता सुनील शेट्टीचे वडील वीरप्पा शेट्टी यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९३ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. मंगळवारी मध्यरात्री १.३० वाजता त्यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वीरप्पा शेट्टी यांचा हॉटेलचा व्यवसाय होता. कालांतराने त्यांचा हा व्यवसाय सुनीलने पुढे चालवला.
हिंदुस्थान टाइम्सला २०१३ मध्ये दिलेल्या मुलाखतीत सुनीलने बाबाच त्याचे खरे हिरो असल्याचे सांगितले होते. सुनीलच्या वरळी येथील एका शोरुम उद्घाटनावेळी त्याने आपल्या बाबांची एक आठवण सांगितली होती. सुनील म्हणाला की, ‘ही तिच जागा आहे जिथे माझे बाबा काम करायचे. इथे एका हॉटेलमध्ये माझे बाबा भांडी घासायचे.’
‘माझे बाबाच माझ्यासाठी खरे हिरो आहेत. वयाच्या ९ व्या वर्षापासून ते काम करत होते. ते जमिनीवर झोपायचे आणि उशी म्हणून गोणीचा वापर करायचे. १९४३ मध्ये सुनील यांच्या वडिलांनी वरळी येथील फोर सिझन्स हॉटेलच्या बाजूची संपूर्ण इमारत विकत घेतली. माझ्या वडिलांच्या वरिष्ठांनी त्यांचा नवीन व्यवसाय सांभाळण्यासाठी विचारले. कालांतराने त्यांनी ती संपूर्ण प्रॉपर्टी विकत घेतली,’ असे सुनीलने आपल्या बाबांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.
वीरप्पा यांना २०१३ मध्ये अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हा सुनीलने त्याच्या संपूर्ण घराचे रुपांतर आयसीयूमध्ये केले होते. अथिया शेट्टीचा पहिला सिनेमा प्रदर्शित होणार होता, त्याच काळात वीरप्पा यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. पण सुनीलने आपल्या वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला अधिक प्राधान्य दिले. सुनील आपल्या वडिलांच्या फार जवळ होता. सुनीलने आधीही मुलाखतीत म्हटले होते की, वडिलांच्या तब्येतीपेक्षा त्याच्यासाठी काही महत्त्वाचे नाही. वडिलांसाठी सुनीलने करिअरही सोडले होते. अनेक वर्ष त्याने कोणतेही सिनेमे केले नव्हते.
सुनीलने २०१४ मध्ये सांगितले होते की, ‘मी तीन महिने नीट झोपूही शकलो नव्हतो. एकीकडे अथिया तिच्या करिअरला सुरुवात करत होती तर दुसरीकडे बाबांची तब्येतही ठीक नव्हती. माझ्या मनात संमिश्र भावना होत्या.’