गेली अनेक वर्षे केवळ चर्चेत असलेला ठाणे जिल्हा विभाजनाचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली असून १ मे रोजी नवा जिल्हा अस्तित्वात येणार, असे स्पष्ट संकेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतच दिले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने कळवा येथे सुमारे १० एकर जागेत भव्य सभासंकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
जिल्हा विभाजनाचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला असून २६ जानेवारीदरम्यान नवा जिल्हा अस्तित्वात येईल, असा अंदाज होता. विधानसभेत बाळा नांदगावकर यांनी विचारणा केली असता, जिल्ह्याच्या विभाजनाची प्रक्रिया सध्या सुरू असून १ मे रोजी नवा जिल्हा जाहीर व्हावा, असा प्रयत्न असल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले. शहरातील दुय्यम निबंधक, आरोग्य, क्रीडा, शिक्षण आदी विभागांची कार्यालये सध्या खाजगी इमारतीमध्ये असून ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कळव्यात सरकारची ७२ एकर जागा असून या जागेत सर्व कार्यालयांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद, महावितरण, सामाजिक न्याय भवन, क्रीडा विद्यापीठ, क्रीडा संकुलासाठीही जागा देण्यात येणार असून सर्व विभागांकडून आवश्यक जागेचा तपशील मागविण्यात आला आहे. येत्या तीन माहिन्यांत त्याचा आराखडा तयार करण्यात येईल, असेही थोरात यांनी सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड, बाळा नांदगावकर, शशिकांत शिंदे आदींनी याबाबत प्रश्न विचारला होता.ठिकाणी १० एकर जागेवर विलासराव देशमुखांच्या नावे पुण्यातील यशदाच्या धर्तीवर भव्य सभागृह व बहुउद्देशी संकुल उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आल्यास त्याचाही विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane district division on maharashtra day