नागपूर: महायुतीच्या यशामागे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यशस्वी प्रचार आणि महिला मतदारांवर त्याचा दिसून आलेला सकारात्मक प्रभाव असल्याचे जाणकार सांगतात. राज्य सरकारने पुन्हा एकदा महिलांना आनंद देणारी आणि आत्मनिर्भर करणारी योजना आणली आहे. त्यामुळे महिलांना उद्योजक होता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने गरीब व गरजू महिलांसाठी एक खूप चांगली योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते. यामुळे त्या स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात आणि घरखर्चासाठी पैसे कमवू शकतात. सरकारचे उद्दिष्ट हे आहे की महिलांनी कुणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे. तुम्ही जर या योजनेला पात्र असाल, तर ही संधी नक्की वापरा. लवकर अर्ज करा, सरकारची मदत घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. आता वेळ आहे स्वप्न पूर्ण करण्याची!

या योजनेत किती मदत मिळते?

सरकार या योजनेत ९०% पैसे देते. म्हणजे जर गिरणी घेण्यासाठी १०हजार रुपये लागले, तर त्यातले ९ हजार रुपये सरकार देते आणि फक्त १ हजार रुपये महिलेला भरावे लागतात. त्यामुळे कमी पैशात गिरणी मिळते आणि व्यवसाय सुरू करणे सोपे होते.

तुम्ही घेऊ शकता योजनेचा लाभ

  • अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातली असावी
  • ती अनुसूचित जाती किंवा जमातीची असावी
  • वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे
  • तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न १.२० लाखांपेक्षा कमी असावे
  • ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना आधी संधी दिली जाते

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला काही कागदपत्रं द्यावी लागतात:

आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
बँकेचे पासबुक
गिरणी खरेदीसाठी कोटेशन (गिरणी किती रुपयांना मिळणार आहे ते लिहिलेला कागद)

योजनेतून काय फायदे होतात?

गिरणी मिळाल्यावर महिला घराजवळ पीठ दळण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. गावात अशा सेवा फार कमी असतात, त्यामुळे अनेक लोक पीठ दळण्यासाठी त्यांच्या गिरणीकडे येतात. यामुळे महिलेला रोज काहीतरी उत्पन्न मिळतं. जर व्यवसाय चांगला चालला, तर त्या मोठ्या प्रमाणात पीठ तयार करून विकू शकतात आणि जास्त पैसे मिळवू शकतात.