नागपूर : राज्यातील अनेक भागात कुत्रे, मांजर पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कुटुंबातील सदस्या प्रमाणेच या प्राण्यांना सांभाळले जाते. परंतु राज्यातील अनेक भागात कुत्रे, मांजर, माकडांसह इतर प्राण्यांमुळे नागरिक त्रासले आहे. मागील तीन वर्षांची आकडेवारी बघता या प्राण्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या तिप्पट वाढली आहे. प्राण्यांनी चावा घेतल्यावर नागरिकांना उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात मांजराकडून रोज ३३८ व्यक्तींना तर माकडाकडून रोज २१ व्यक्तींना चावा घेतला आहे. २०२२ च्या तुलनेत २०२४ मध्ये मांजर व माकडांनी चावा घेतलेल्या घटनांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून हा तपशील समोर आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, राज्यात कुत्रे, मांजर, माकड, घोड्यासह सगळ्याच प्राण्यांनी २०२२ मध्ये ६ लाख २० हजार ५५९ व्यक्तींचा चावा घेतला.

हेही वाचा >>> नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट, महापालिकेकडून ‘या’ महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात

सगळ्या प्राण्यांनी चावा घेलेल्यांपैकी २९ जणांचा रॅबीजने मृत्यू झाला. याच प्राण्यांनी २०२३ मध्ये ९ लाख ५ हजार ३२ जणांचा चावा घेतला. त्यापैकी ३० जणांचा मृत्यू झाला. १ जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान १२ लाख २५ हजार ७८० जणांचा चावा घेतला. त्यापैकी १८ जणांचा रॅबीजने मृत्यू झाला. एकूण चावा घेतलेल्यांपैकी मांजराने चावा घेतलेल्यांची संख्या २०२२ मध्ये २७ हजार ८१८ व्यक्ती, २०२३ मध्ये ६० हजार ५४३ व्यक्ती, २०२४ मध्ये (ऑक्टोबरपर्यंत) १ लाख ३ हजार २०० व्यक्ती इतकी होती. माकडाने २०२२ मध्ये २ हजार ६४५ जणांचा चावा घेतला. २०२३ मध्ये ५ हजार ४४३ जणांचा तर २०२४ मध्ये (ऑक्टोबरपर्यंत) ६ हजार ४४३ जणांचा चावा घेतला. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलाकर यांनी याबाबतची माहिती मागितली होती.

हेही वाचा >>> धक्कादायक! नापास का होतोस? असे विचारले म्हणून  मुलाने आई-वडिलांनाच संपवले..

रेबीजचे कारण काय ?

रेबीज हा विषाणूजन्य आजार दीडशेहून जास्त देशात आढळतो. मानवी रेबीज मृत्यूचे बहुसंख्य स्त्रोत कुत्रे आहेत. जे मानवांना होणाऱ्या सर्व रेबीज संक्रमणापैकी ९९ टक्के पर्यंत आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीज होऊन जगात ५५ हजाराहूनजास्त लोकांचा बळी जातो. भारतात रेबीज रुग्णांची संख्या मोठी आहे. तत्काळ आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास रेबीजचे मृत्यू नियंत्रणात येेणे शक्य असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात.

आकडे काय सांगतात?

प्राणी             २०२२                २०२३        २०२४ (ऑक्टोबरपर्यंत)

मांजर             २७,८१८             ६०,५४३         १,०३,२००

माकड             २,६४५             ५,४४३           ६,४४३

सर्वच प्राणी     ६,२०,५५९      ९,०५,०३२          १२,२५,७८०

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens bitten by animals tripled in last three years in maharashtra mnb 82 zws