नागपूर : शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर म्हणून वाहनचोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत ५ हजार ३०० पेक्षा जास्त वाहने चोरी गेल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी फक्त १७७१ वाहनेच शोधून काढली आहेत. वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक असूनही छडा लावण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबत पोलिसांचे मैत्रीपूर्ण संबंध आणि पोलिसांवर वाढता राजकीय दबावामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. यासोबतच गस्तप्रणालीमध्ये होणाऱ्या हलगर्जीपणामुळेही शहरात चोरी, घरफोडी, दरोडा आणि लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांची वाहनचोरीच्या घटनांमध्ये बरीच मोठी वाढ झाली आहे. दुचाकी, चारचाकींसह ट्रक आणि जड वाहनेसुद्धा चोरीला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत ५ हजार ३०९ वाहने चोरी गेल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. त्यामध्ये वर्ष २०२२ मध्ये १५५३ वाहने शहरातून चोरी गेले होते. त्यापैकी केवळ ५४८ वाहनांचा शोध पोलिसांनी लावला. २०२३ मध्ये १८०९ वाहने चोरी गेल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्यापैकी फक्त ६२४ वाहनांचा शोध पोलिसांनी घेतला. तसेच २०२४ मध्ये सर्वाधिक १९४७ वाहनांच्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी ५९९ वाहनांचा शोध पोलिसांनी घेतला. वाहन चोरीच्या घटनांचा विचार केला असता केवळ सरासरी ३२ टक्केच चोरीच्या वाहनांचा शोध पोलिसांनी घेतल्याचे स्पष्ट होते.

चोरीची वाहने थेट मध्यप्रदेशात

मध्यप्रदेशातील वाहन चोरांच्या सर्वाधिक टोळ्या नागपुरात येतात. नागपुरातून वाहन चोरी करुन थेट मध्यप्रदेशात नेल्या जातात. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि खेड्यातील युवकांना कमी पैशांत विक्री करतात. तसेच चांगल्या स्थितीतील वाहनांचे सुटे भाग करुन गॅरेज मालकांना विक्री करतात. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सर्वाधिक आरोपी मध्यप्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष पथक करते तरी काय?

गुन्हे शाखेच्या नेतृत्वात वाहनचोरी विरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे. वाहन चोरी रोखण्यावर या पथकाने भर देणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या पथकाची अपेक्षित अशी कामगिरी दिसत नाही. पथकाकडे विशेष वाहन असूनही पथक नावालाच असल्याची चर्चा आहे. यासोबतच मोठा गाजावाजा करुन ‘क्युआर कोड स्कॅन’ करुन गस्त घालण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. मात्र, तो उपक्रम बंदावस्थेत असल्याची चर्चा आहे.

वाहनचोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक चोवीस तास कार्यरत असते. आतापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. वाहनचोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यात पथकाला बरेच यश आले आहे. – राहुल माकणीकर (पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur over 5000 vehicles stolen in three years in the sub capital adk 83 ssb