ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तीन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर उद्या, १६ ऑक्टोबरपासून पर्यटनासाठी खुला करण्यात येत असून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) प्रमुख सात रस्ते पर्यटनासाठी बंद केल्याने व जिप्सीची संख्या १३६ वरून १०७ इतकी केल्याने पर्यटकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. तब्बल २९ गाडय़ा कमी झाल्याने याचा थेट परिणाम क्षेत्र संचालकांच्या हाती असलेल्या व्हीआयपी कोटय़ावर होणार आहे.
पावसाळय़ातील जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर असे तीन महिने ताडोबा प्रकल्प पर्यटकांसाठी अंशत: खुला असतो. दिवसभरात काही मोजक्या गाडय़ा प्रकल्पात सोडण्यात येतात. त्यातही प्रकल्पातील पर्यटनाचे सर्व प्रमुख रस्ते या काळात बंद असतात. शुक्रवार १६ ऑक्टोबरपासून प्रकल्प पर्यटकांसाठी पूर्णत: खुला करण्यात येत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्लीचे सहायक महानिरीक्षक वैभव माथुर यांनी सप्टेंबर महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सलग तीन दिवस पाहणी केली. या पाहणीत त्यांना ताडोबातील पर्यटनात कमालीची वाढ झाल्याचे व ही वाढ वाघ, बिबटय़ासह अन्य वन्यप्राण्यास धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ताडोबा प्रकल्पातील काही प्रमुख रस्ते बंद करण्याची आणि वाहनांची संख्या १३६ वरून १०७ इतकी करण्याचा अहवाल सादर केला.
सहायक महानिरीक्षक माथुर यांच्या अहवालानंतर ताडोबातील प्रमुख सात रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामध्ये ताडोबा वनपरिक्षेत्रातील पांढरपौन ते काळाआंबा, वसंत बंधारा-काटेझरी-काळाआंबा-पांढरपौनी हे दोन रस्ते बंद केले. कोळसा वनपरिक्षेत्रातील कोळसा ज्वाईट रोड-टाकळघाट ते रामसिंग आंबा, राथवाकुवाणी-पांगडी, कोळसा-रायबाचौक-बेलन चौक, हेडीफोडीलाईन ते सुकरी बोडी व मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील अंधारी(कातरणी लाईन)-आंबेउतारा-बोटेझरी कॅम्प अर्थात मोहुर्ली येथून थेट कोळसा येथे जाणारा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. एनटीसीएच्या निर्देशानुसार हे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. ताडोबा प्रकल्पात पर्यटनासाठी आजवर १३६ गाडय़ा सोडण्यात येत होत्या. मात्र आता १०७ गाडय़ा सोडण्याची सूचना एनटीसीए कडून आली आहे. सध्या स्थितीत ऑनलाईन बुकींगमुळे गाडय़ांची संख्या तेवढीच राहणार असली तरी आठवडय़ाभरात ती कमी केली जाणार आहे. ताडोबाच्या सहा प्रवेश व्दारातून मोहुर्ली येथून ६०, कोलारा ३२, नवेगांव १२, झरी ६, पांगडी ६ व खुटवंडा ८ गाडय़ा सोडल्या जात होत्या. गाडय़ांची संख्या व रस्ते बंद करण्यात येत असल्यामुळे पर्यटकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ताडोबात पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने प्रचंड परिश्रम घेत आहेत. मात्र एनटीसीएच्या या नियमावलीमुळे पर्यटनाच्या उद्देशालाच धक्का बसला आहे. व्याघ्र दर्शनाचे सर्वच प्रमुख रस्ते बंद झाले तर आम्ही वाघ बघायचा तरी कुठे अशा प्रतिक्रिया सामान्य पर्यटक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे एनटीसीएने ताडोबात सुरू असलेले चार कॅटर आणि एक मिनीबस याला सुध्दा १०७ वाहनांमध्ये गणना केली आहे. एका कॅटरमध्ये २२ पर्यटक आणि मिनी बसमध्ये १८ पर्यटक असतात तर जिप्सीत सहा पर्यटक असतात. एनटीसीएने २२ पर्यटकांच्या एका कॅटरला चार जिप्सी व १८ पर्यटकांच्या मिनीबसला दोन जिप्सी अशा संख्येत पकडले आहे. यापूर्वी पर्यत ताडोबात जिप्सी आणि कॅटर वेगवेगळे होते. मात्र या दोन्हीचा १०७ वाहनात प्रवेश केल्याने चांगलीच अडचण झाली आहे. विशेष म्हणजे या सर्वाचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, कोर व बफरचे उपवनसंरक्षक यांच्या हाती असलेल्या व्हीआयपी प्रवेश कोटय़ावर परिणाम होणार आहे.
गाडय़ांची संख्या २९ ने कमी झाली तर व्हीआयपी अतिविशिष्ट पर्यटकांना देणार तरी कसा असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ.जे.पी.गरड यांच्याशी संपर्क साधला असता एनटीसीएच्या निर्देशानुसार सध्या रस्ते बंद केलेले आहेत. ऑनलाईन बुकींग झाले असल्याने गाडय़ांची संख्या सध्या ‘जैसे थे’ ठेवण्यात आलेली आहे. या संदर्भात वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांना पत्र लिहून याचा पर्यटनावर विपरित परिणाम होणार असल्याचे कळविले आहे. त्यांच्याकडून सूचना आल्यानंतर समोरील कार्यवाही करण्यात येईल. सध्या मी सुटीवर आहे. कर्तव्यावर रूजू होताच यासंदर्भात सकारात्मक दृष्टीने काय करता येईल हे बघील, असेही गरड ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले.