नागपूर : रखरखत्या उन्हाचा त्रास फक्त माणसांनाच होत नाही तर प्राण्यांनाही तो तितकाच होतो. त्यातही विदर्भातले तापमान आता ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. माणूस कुलर, एसी यासारख्या थंडावा देणाऱ्या साधनांनी उष्मा घालवण्याचा प्रयत्न करत आहे, पण वन्यप्राण्यांच्या अधिवासात ही सोय करता येत नाही. झाडांचीच काय ती थोडीफार सावली त्यांच्या अंगावर पडते आणि अंगाचा दाह घालवण्यासाठी नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्याचा ते आधार घेतात. हा उष्मा घालवण्यासाठी वाघांची चाललेली कसरत वन्यजीव छायाचित्रकार अमित खापरे यांनी टिपली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वन्यप्राण्यांसाठी उन्हाळ्यात नैसर्गिक पाणवठे अपूरे पडू शकतात आणि त्यामुळेच जंगलात ठिकठिकाणी त्यांच्यासाठी कृत्रिम पाणवठ्याची देखील सोय केली जाते. या पाणवठ्यात पूर्वी टँकरने पाणी आणून टाकले जात होते. कालांतराने त्याठिकाणीच हातपंप लावण्यात आले आणि आता सौर उर्जेवर आधारित यंत्रणा ते पाणवठे भरण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हे पाणवठे सिमेंटचे असल्याने ते फार काळ त्यात बसून राहू शकत नाही. मात्र, नैसर्गिक पाणवठ्यांची बातच न्यारी. जो थंडावा या पाणवठ्यात मिळतो, तो कृत्रिम पाणवठ्यात मिळत नाही.

हेही वाचा – देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले

वनमहर्षी मारुती चितमपल्ली देखील हेच सांगतात. जेवढे नैसर्गिक पाणवठे जिवंत करता येतील, तेवढे करा. मात्र, हल्ली पर्यटनाच्या मार्गावर हे कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. उद्देश एकच तो म्हणजे पर्यटकांना वाघ दिसावा. तरीही ताडोबातील वाघ नैसर्गिक पाणवठ्याचाच आधार अधिक घेतात. कृत्रिम पाणवठ्यावरील त्यांचे अनेक छायाचित्रे येतात, पण नैसर्गिक पाणवठ्यावरील त्यांच्या अदा काही वेगळ्याच असतात. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटी राणी’ ही वाघीण आणि एक समवयस्क वाघ सिरखेडा बफर क्षेत्रात पाणवठ्यात बसून अंगाचा दाह कमी करताना दिसून आले.

हेही वाचा – पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांची आता गाभा क्षेत्रापेक्षा बफर क्षेत्रातच अधिक पसंती दिसून येते आणि या बफर क्षेत्रातील वाघही पर्यटकांना निराश करत नाहीत. उन्हाळ्याचा ऋतू असल्याने उष्म्यापासून सुटका करण्यासाठी ते कायम पाणवठ्यावर दिसतात. विदर्भातील तापमानाचा पारा प्रचंड वेगाने चढत आहे. उकाड्यातही वाढ झाली आहे. उष्णतेच्या लाटेने साऱ्यांनाच हैराण केले आहे. अशा परिस्थितीत ताडोबाच्या जंगलातील या वाघांनी नैसर्गिक पाणवठ्यात अंगाचा दाह कमी होईस्तोवर मुक्काम ठोकला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigers in tadoba prefer natural water bodies to escape the scorching sun rgc 76 ssb