निधी मंजूर असूनही चालढकल; वाडा येथील गालतरे गावातील प्रकार

पालघर: वाडा तालुक्यातील हमरापूर- गालतरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्यावरील आंब्याच्या मोरीची कित्येक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. या मोरीचे नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून निधी उपलब्ध करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत मोरीचे काम सुरूच झालेले नसल्याने या धोकादायक मोरीवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी गेल्या महिन्यातच या मोरीच्या कामासाठी उद्घाटन केले आहे. ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही ठेकेदार करोना व पावसाचे कारण सांगून ही मोरी बनवण्यास टाळाटाळ करीत आहे, असे सांगितले जाते.

या गावांसाठी पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे नागरिकांना या मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मोरी दुरवस्थेत असल्याने वाहन चालक, शेतकरी, नोकरदार वर्ग, बागायतदार, विद्यार्थी यांचा दररोजचा जीवघेणा प्रवास या रस्त्यावरून आजही सुरूच आहे.

मोरीची दुरवस्था झाल्याने येथे कधीही अपघात घडण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर पावसाळ्यात पुराच्या पाण्याने रस्ता खचून प्रवासादरम्यान जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. या मोरीवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर पालघरमधील लोकप्रहार संघटनेने ही बाब जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्यानंतरही बांधकाम विभागाने ठेकेदाराला कोणत्याही सूचना केलेल्या नसून चालढकल सुरू आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्पुरती वाहतुकीसाठी पर्यायी सोय करण्याच्या सूचना देत आहे.

– माधव शंकपाळे, कार्यकारी अभियंता, बांधकाम, जि.प. पालघर

मोरीची दुरवस्था झाली असल्याची बाब कळली आहे. दळणवळणाच्या दृष्टीने इतर मार्ग किंवा तात्पुरत्या स्वरूपाची सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देते.

– भारती कामडी,अध्यक्ष, जि. प. पालघर

मोरीची दुरवस्था झाली आहे. येथे अपघात घडून नागरिकांचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? तातडीने मोरी नूतनीकरण करून नागरिकांचा प्रवास सुखकर करावा.

– स्वप्निल तरे, लोकप्रहार संघटना

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel through a dangerous ditch palghar ssh