रिपब्लिकन पक्षासोबत आता समाज नाही, फक्त नेतेच उरले आहेत. महाराष्ट्रातील बहुजन समाज आता बहुजन समाज पक्षाकडे मोठय़ा अपेक्षेने आकर्षित होऊन कामाला लागला आहे, असे वक्तव्य या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी बुधवारी केले.
बहुजन समाज पक्षातर्फे ‘मला तुमच्यातील पंतप्रधान झालेला पाहावयाचा आहे’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी ‘मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय’ हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. या वेळी पक्षाचे प्रदेश सचिव अजित ठोकळे, जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड, प्रदेश कार्य सदस्य काळूराम चौधरी, राजेश बेंगळे आदी कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थि होते.
गरुड म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीच दुसऱ्या कायद्यात बहुजन समाजाला अनुसूजित जाती जमाती म्हणून अधिकार मिळवून दिला. डॉ. बाबसाहेबांना वाटत होते, की आपल्या समजातील एखादा व्यक्ती पंतप्रधान व्हावा. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यावर समाजाने भर द्यावा. अनेक वर्षांचे शोषण आणि अधिकारापासून वंचित राहिल्यामुळे बहुजनांना कधीच सत्ता मिळाली नाही. परंतु महाराष्ट्रात बहुजनांची सत्ता आली तर कायद्याचे राज्य प्रस्थापित होईल, आणि सर्व घटकातील लोकांना समान न्याय मिळेल. अन्यायमुक्त होण्यासाठी सत्ताधारी झाले पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एकत्र यायला हवे. २०१४ मधील निवडणुकांमध्ये देशाचा पंतप्रधान दलित म्हणजेच तुमच्यातील झाला पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No social with republican party only leaders