‘स्मार्ट सिटी’साठी पुणे व पिंपरीचा एकत्र प्रस्ताव सादर करणे ही चूक असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवडवर अन्याय होणार नाही, यादृष्टीने सकारात्मक विचार करू आणि पिंपरी पालिकेचे आक्षेप नोंदवून घेत शहराचा प्रस्ताव पुन्हा तपासून पाहू, अशी ग्वाही केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी पालिकेच्या शिष्टमंडळाला दिल्लीत बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायडू यांची दिल्लीत भेट घेतली, तेव्हा नायडू बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते विनोद नढे, आयुक्त राजीव जाधव, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल, नगरसेवक अजित गव्हाणे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
पिंपरी-चिंचवडची सविस्तर माहिती देत ‘स्मार्ट सिटी’तून वगळण्यात आल्याने शहरावर अन्याय झाल्याची बाब शरद पवार तसेच अजितदादांनी नायडू यांच्या निदर्शनास आणून दिली. औद्योगिकनगरी असलेल्या आणि वेगाने विकसित झालेल्या या शहराला अशाप्रकारे डावलण्यात आल्यास त्याचा चुकीचा संदेश जाईल, असे त्यांनी सांगितले. शहराचा झपाटय़ाने झालेला विकास, केंद्र सरकारने दिलेल्या ‘बेस्ट सिटी’सह अन्य महत्त्वपूर्ण पुरस्काराची माहिती त्यांना देण्यात आली. आयुक्त राजीव जाधव यांनी, प्रशासकीय स्तरावरील माहिती दिली. त्यानंतर नायडू यांनी शिष्टमंडळाचे आक्षेप नोंदवून घेण्याची तयारी दर्शवली आणि स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पिंपरी-चिंचवडविषयी आपल्याला माहिती आहे. सचिवांना याबाबतचा प्रस्ताव पुन्हा तपासून घेण्याच्या सूचना देऊ. ‘स्मार्ट सिटी’संदर्भातील शहरे निवडण्याचे अधिकार राज्यांना दिले होते. निरपेक्ष भावनेने निर्णय अपेक्षित आहेत. शहरांची निवड झाल्यानंतरही काही म्हणणे असल्यास ते मांडण्याची मुभा होती. मात्र, कोणीही तसे म्हणणे मांडले नाही, याकडे नायडू यांनी लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyankayya naidu assured about pcmc smart city