राज्यातील दुष्काळामध्ये होरपळलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. मुख्यमंत्री साहायता निधी दुष्काळ असे निधी संकलनासाठी नवीन खाते सुरू करण्यात आले आहे. कितीही गंभीर परिस्थिती आली तरी दुष्काळाचा सामना करून सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे दुष्काळग्रस्तांसाठी आयोजित हिरवा चारा अभियानांतर्गत किवळे येथील ४० एकर जमिनीवर मका बीजाचे रोपण पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, विनायक निम्हण, उपमहापौर दीपक मानकर, माजी आमदार चंद्रकांत छाजेड, शहराध्यक्ष अभय छाजेड, जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक मिलिंद काची याप्रसंगी उपस्थित होते. काँग्रेस नगरसेवकांतर्फे दोन लाख दहा हजार रुपये या एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री साहायता निधीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तर, दुष्काळ निवारणासाठी एक टँकरही याप्रसंगी देण्याची घोषणा करण्यात आली. घरेलू महिला कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन महिलांना प्रदान करण्यात आला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील १६ जिल्ह्य़ांत दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे. पावसाला किमान तीन-साडेतीन महिने अवकाश आहे. सलग दुसऱ्या वर्षी पावसाने दडी मारली असून सध्या जायकवडी धरणातील मृत साठा वापरला जात आहे. दर दिवशी ६० रुपये प्रति जनावर याप्रमाणे सव्वाचार लाख पशुधन सांभाळले जात आहे. त्यांच्यासाठी चारा निर्मितीचा व्यापक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. बीड, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्य़ांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. साखर कारखाने बंद झाल्यावर चाऱ्याची टंचाई निर्माण होईल. दुष्काळ निवारणासाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबरीने दुष्काळाने होरपळलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. दुष्काळ निवारणासाठी दूरगामी योजना हाती घेण्यात आली असून अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. पाणी, चारा टंचाईची एकही तक्रार असेल तर संकेतस्थळावर नोंदविल्यास त्याचे निवारण करण्यात येईल.
या वेळी माणिकराव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. अभय छाजेड यांनी प्रास्ताविक केले. अरविंद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
काची कुटुंबीयांचा पुढाकार
दुष्काळ निवारणासाठी काची कुटुंबीयांनी पुढाकार घेतला आहे. १९७२ आणि २००३ च्या दुष्काळामध्ये किवळे येथील शेतामध्ये पशुधनासाठी हिरवा चारा पिकविण्याचे काम काची यांनी केले होते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पशुधन जगविण्यासाठी नगरसेवक मिलिंद काची यांनी पुढाकार घेतला असून २३ एकर शेतामध्ये मका बीजाचे रोपण करण्याचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. आफ्रिकन टॉल जातीचे हे बीज साधारणपणे ५०-५५ दिवसांत चार फूट उंच उगवते. आता ठिबक सिंचन पद्धतीने ४५ दिवसांत हा हिरवा चारा तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पुढील आठवडय़ात आणखी १७ एकर जमिनीवर मक्याची लागवड करण्यात येणार असून यंदाच्या दुष्काळाच्या वातावरणामध्ये एक हजार टन हिरवा चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे मिलिंद काची यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2013 रोजी प्रकाशित
कितीही गंभीर परिस्थिती आली तरी दुष्काळाचा सामना करू – मुख्यमंत्री
राज्यातील दुष्काळामध्ये होरपळलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. मुख्यमंत्री साहायता निधी दुष्काळ असे निधी संकलनासाठी नवीन खाते सुरू करण्यात आले आहे. कितीही गंभीर परिस्थिती आली तरी दुष्काळाचा सामना करून सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-03-2013 at 01:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will fight drought in any worse condition cm