लहान मुलांचा मृत्यू, तरुणांचा मृत्यू, वृद्धांचा मृत्यू हा तर शाश्वत आहे. लोक मदत शिबिरांमध्येच मरतात असे नाही. ते तर महालांतही मरतात. उत्तर प्रदेशचे क्रीडामंत्री नारद राय यांचे हे विधान. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. खरेतर या तत्त्वविचाराने आपणास आनंदच व्हायला हवा. आपल्याला उगाचच वाटत असते की आपले नेतेगण हे गणंग असतात. परंतु नारद राय यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे, की तेही तत्त्वज्ञ असतात. अत्यंत उच्च स्तरावरून ते विचार करीत असतात. म्हणून तर त्यांनी मृत्यूच्या अटळतेवर भाष्य करून आपणास जगण्याची क्षणभंगुरता दाखवून दिली. संतांनी तरी वेगळा काय संदेश दिलेला आहे? आपल्या राज्यकर्त्यांतील हे तत्त्वज्ञ पाहून तिकडे स्वर्गात प्लेटोने शांतपणे डोळे मिटले असतील! पुन्हा प्राचीन संतांप्रमाणे नारद राय आणि त्यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांनी कथनी आणि करणीत फरक केलेला नाही. तर जगणे हे किती क्षणभंगुर असते याचे वस्तुपाठ आपल्या राज्यात घालून दिले आहेत. मुझफ्फरनगरची दंगल हे तर त्याचे जितेजागते उदाहरण आहे. जाट आणि मुस्लिमांच्या त्या दंगलीत मेले ते मेले. त्यांच्याबद्दल शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण मरणे हे शाश्वत सत्य आहे. त्यातून काही वाचले. त्यांनी मदत शिबिरांमध्ये आसरा घेतला. अर्थात हे प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. थोर समाजवादी नेते मुलायमसिंह यांचे वास्तव मात्र वेगळेच आहे. ते म्हणतात, हे काही पीडित लोक नाहीत. भाजप आणि काँग्रेसने पेरलेले षड्यंत्रकारी आहेत. आता असे कटकारस्थानी मेले तर मेले. मृत्यू शाश्वत असल्याने मेले. तर पुन्हा माध्यमांनी त्यावरून मुलायमसिंह आणि त्यांचे सुविद्य पुत्र व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना धारेवर धरले. या माध्यमांना ही फार वाईट खोड. ती जातीयवादी, ढोंगी धर्मनिरपेक्ष, षड्यंत्रकारी असल्यानेच हे होत असावे. अशा या माध्यमांचे म्हणणे असे, की मदत शिबिरांतल्या ३४ मुलांचा थंडीने मृत्यू झाला. सामान्य विज्ञान माहीत नसले, की अशी अवैज्ञानिक विधाने केली जातात. मात्र उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे मुख्य सचिव ए. के. गुप्ता यांनी त्याला परस्परच उत्तर देऊन टाकले. ते म्हणाले, थंडीने कोणी मरत नसते. जर थंडीने कोणी मरत असते, तर सायबेरियात कोणी वाचलेच नसते. मग प्रश्न येतो की मुले का मेली? तर मृत्यू शाश्वत असतो म्हणून मेली. त्याचे सुतक तरी किती पाळायचे? मुले मेली म्हणून झेंडा अध्र्यावर उतरवून राज्यकारभार ठप्पच करायचा की काय? म्हणूनच अखिलेशजींनी उत्तर प्रदेशच्या नऊ मंत्र्यांना सरळ ब्रिटन, नेदरलँड्स, ग्रीस आणि यूएईच्या दौऱ्यावर तेथील संसदीय कार्यप्रणालीच्या अभ्यासासाठी पाठवून दिले. आता यूएईमध्ये लोकशाही आहे की नाही हा भाग वेगळा. पण अभ्यास हवाच. मुलायमसिंहजी दरवर्षी आपली जन्मभूमी सफईमध्ये एक सांस्कृतिक महोत्सव भरवत असतात. यंदाही त्यांनी तेथे तारे-तारकांचे नृत्य ठेवले. तर लोकांनी त्यावरही टीका केली. मुले मेली म्हणून असे सत्कार्य टाळता येते काय? लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा हे रोजचेच प्रश्न झाले. पण लोक सुसंस्कृत होणेही गरजेचे असते, की नाही? आजूबाजूला दंगेधोपे आहेत, उपासमार आहे, बेरोजगारी आहे. एकूण सर्वत्र ‘शाश्वत सत्याचे’ राज्य आहे. अशा वेळी मुलायमसिंह व त्यांच्या सुपुत्राने लोकांचे घडीभर मनोरंजन केले, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. त्याऐवजी त्यांना लखनऊचे नीरो-नबाब म्हणणे हे खूप खूप अन्यायाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav and team nero nawabs of lucknow