साम्ययोग हा गीतेचा अर्थ विनोबांनी लावला असला तरी त्यांचे साहित्य वाचून तो समजत नाही. गीतेची निर्मिती कार्यक्षेत्रात झाली तसाच साम्ययोगही प्रत्यक्ष जगण्याचे प्रश्न सोडवताना समोर आला. या विचाराने भौतिक साम्याच्या स्थापनेपासून आरंभ केला. विनोबा, गीतेचा ग्रांथिक अर्थ लावत होते तेव्हा ते स्वातंत्र्य संगरात होते. पुढे गीतेचा साम्ययोगपर अर्थ लावताना ते सर्वोदय विचाराची पेरणी करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोदय हा स्वातंत्र्योत्तर भारताच्या पुनर्रचनेचा मंत्र आहे. हा मंत्र गांधीजींनी दिला. तो अमलात आणायचा तर भारतीय समाजाची आर्थिक आणि सामाजिक पातळीवर फेररचना करावी लागणार याची त्यांना जाणीव होती. त्याचप्रमाणे लौकिकातील प्रश्न सोडवायचे तर अर्थ, समाज आणि राजनीती या तिन्ही क्षेत्रांचा विचार करणे अटळ आहे हे त्यांना ठाऊक होते.

भारतीय राजकारणात सर्वोदय ही एकमेव विचारधारा नव्हती त्यामुळे अन्य राजकीय विचारसरणींची चिकित्सा आणि त्यांच्याशी संवाद या गोष्टीही गरजेच्या होत्या. सर्वोदयाचे तत्त्वज्ञान घेऊन विनोबांनी ते कार्य केले. आणि अंतिमत: जगासमोर साम्ययोग दर्शन ठेवले. सर्वोदयाचे तत्त्वज्ञान कायम ठेवत त्यांनी त्याला साम्ययोगाची जोड दिली. या दर्शनानुरूप आचरणही केले.

साम्ययोगाची तुलना करताना कळत नकळत साम्यवादाचे स्मरण होते. तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता ते साहजिकही होते. हे स्मरण करताना साम्यवादी साम्ययोगाची अगदी चेष्टेपर्यंत चिकित्सा करतात. तर सर्वोदयी साम्यवादापासून दूर राहतात. रशियातील प्रचंड घडामोडींनंतर साम्यवादाची सहजच टर उडवली जाते.

विनोबा यापैकी कोणतीही भूमिका न घेता सर्वोदयाचे तत्त्व विकसित करताना दिसतात. प्रतिक्रिया आणि उथळ टीका यापेक्षा सर्वोदयाचे रूप फार वेगळे आहे याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे सर्वोदय ते सर्वोदय समाज या प्रवासाची त्यांनी मांडणी केली आणि तो साम्ययोगाच्या मार्गाने होईल हे आवर्जून सांगितले.

सर्वोदय समाजाला समान असणारी आणखी एक कल्पना त्यांनी भूदान यात्रेच्या निमित्ताने मांडली. ही यात्रा रामकृष्ण परमहंसांच्या जन्मगावी म्हणजे कामारपुकूरला पोहोचली तेव्हा विनोबांनी हा अनोखा विचार मांडला. रामकृष्णांचे स्मरण करताना ते म्हणाले की, ‘परमहंसांनी व्यक्तिगत समाधीचा जो प्रयोग केला तो यापुढे सामुदायिक पातळीवर न्यावा लागेल.’ त्यांच्यासमोर सामुदायिक समाधी म्हणून भूदान असावे.

ठाकुरांनी मांडलेला धर्मसमन्वयाचा विचार, स्वत:च्या मोक्षापेक्षा जनसेवेला दिलेले प्राधान्य आणि अध्यात्म विचाराला दिलेली उंची ही तत्त्वे सर्वोदय समाजाच्या निर्मितीमधे अनुस्यूत आहेत. सर्वोदयाचा विचार विकसित करताना विनोबांनी दोन गोष्टींना प्राधान्य दिले, कांचनाच्या मोहापासून मुक्ती आणि शरीरश्रम. यात त्यांना समग्र मुक्तीचा मार्ग दिसला. शरीरश्रम उत्पादक असावेत असे ते आवर्जून सांगत.

जगातील कोणत्याही विचारसरणीला आणि मतांना ही तत्त्वे डावलून पुढे जाता येणार नाही, हा त्यांचा विश्वास होता. त्यांनी भारतासाठी सर्वोदय- साम्ययोग- सर्वोदय समाज असा मार्ग सांगितला. जगाच्या अन्य भागात शब्द बदलतील पण तत्त्वे तीच असतील हा या मांडणीचा निष्कर्ष आहे.

अतुल सुलाखे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyayog path global welfare song meaning vinobani literature ysh