अभिजात संगीताच्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, ते कधीच संपत नाहीत. जयपूर घराण्याच्या कलावंत माणिकताई भिडे यांनी आयुष्यभर हे कष्ट घेतले आणि कलावंत म्हणून स्थान निर्माण केले. माणिकताईंसाठी हे अधिकच अवघड होते, याचे कारण त्यांच्या गुरू किशोरीताई आमोणकर या एक अतिशय प्रतिभाशाली कलावंत होत्या. त्यांच्याकडून विद्या मिळवणे आणि त्यामध्ये भर घालून आपली प्रतिभाही टवटवीत ठेवणे अतिशय अवघड. त्या प्रतिभेचे, सर्जनाचे आव्हान पेलता येण्यासाठी शिष्याकडेही तेवढीच बौद्धिक क्षमता असावी लागते. जयपूर घराण्याच्या पेचदार गायकीमध्ये भावदर्शनाची जोड देण्याचे काम किशोरीताईंनी केले. काळाच्या सरकत्या चकत्यांचे भान ठेवून घराण्याची मूळ चौकट तसूभरही न मोडता, त्यात नवनव्या अलंकारांची भर घालून गायकी श्रीमंत करण्याचे हे कार्य वाटते तितके सोपे नव्हतेच. असामान्य बुद्धीच्या आणि सर्जनाच्या जोरावर करण्यासाठीही कमालीचे धैर्य लागते. किशोरीताईंकडे ते होते, म्हणूनच जयपूर घराण्याच्या या शैलीलाही रसिकांनी भरभरून दाद दिली. किशोरीताईंच्या सहवासात दीर्घकाळ राहून माणिकताईंनी आपली म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. हे काम फारच अवघड.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका अतिशय प्रतिभावंताच्या सहवासात राहूनही त्याची नक्कल करण्याच्या मोहापासून दूर राहून ती शैली जवळून न्याहाळणे आणि त्यातले सगळे बारकावे समजून घेत, शैलीच्या गाभ्यापर्यंत पोहोचणे, हे कोणत्याही प्रतिभावंत कलावंताच्या सहवासात येणाऱ्या शिष्यवर्गासाठी आव्हानात्मक असते. माणिकताईंनी ते आव्हान स्वीकारले. स्वत: मैफली गाजवत असतानाही आपल्याकडे असलेली विद्या मुक्त हस्ते शिष्यवर्गात देण्याचे अतिशय महत्त्वाचे काम माणिकताईंनी मन लावून केले. त्यांची कन्या अश्वनी भिडे-देशपांडे हे तर त्याचे सहज लक्षात येणारे उदाहरण. घराणे टिकवायचे, तर त्यात सतत नवे प्रवाह मिसळत राहणे आवश्यक असते. मात्र असे करताना, शैलीच्या केंद्रबिंदूशी प्रतारणाही करायची नसते. संगीत ही प्रवाही कला आहे. खयाल गायनाची परंपरा सुरू झाल्यानंतर, त्या काळातील जे कलावंत गायन करती होते, तसेच गायन आजच्या काळातही करत राहिले, तर ते रसिकांना भावेलच, असे नाही. संगीतावर बदलत्या काळाचा आणि भवतालातील घडामोडींचाही परिणाम होत असतो. हे भान किशोरीताईंप्रमाणेच  माणिकताईंकडेही होते. त्यामुळेच त्यांनी आपले गायन सतत रसिकसापेक्ष राहील, याची काळजी घेतली. अभिजात संगीतात कलावंताच्या सृजनाएवढेच गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण असते. उत्तम कलावंताच्या निर्मितीमधील गुरूचे अस्तित्व नंतरच्या पिढय़ांना कळून येते. त्या अर्थाने माणिकताईंचे कार्य अधिक महत्त्वाचे म्हटले पाहिजे. किशोरीताईंच्या जुन्या काळातील बहुतेक सर्व ध्वनिमुद्रणात मागे तंबोऱ्याची साथ करताना मध्येच गायनाचीही संधी मिळाल्यानंतर त्याचे माणिकताईंनी कसे सोने केले, ते ऐकण्यासारखे आहे. त्यांच्या निधनाने एक उत्तम कलावंत आणि गुरू आपल्यातून निघून गेला आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh in the field of classical music identity maniktai bhide passed away ysh