शहापूर : भातसा कालव्याला वासिंद जवळ भगदाड पडून मंगळवारी लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले नसले तरी भगदाड पडल्याने कालव्याचे पाणी बंद करण्यात आले असून आता पाण्याअभावी उन्हाच्या तडाख्यात पिके करपून नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. कालव्याला भगदाड पडण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा कालवा आता हानिकारक ठरू लागल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भातसा धरणापासून ३१ किमी अंतरावर वासिंद गावाजवळ मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उजव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. भगदाड पडलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पिके घेतली नसल्याने तेथील पिकांची नासाडी झाली नाही. कालव्याचे पाणी आता बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच कालव्याचे पाणी काही दिवस बंद करण्यात आले होते. आता पुन्हा पाणी बंद करण्यात आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ४० वर्षे जुना झालेल्या भातसा उजवा कालव्याला उंदीर, घुशी आणि खेकड्यानी पोखरून ठेवल्याने पाण्याची प्रचंड प्रमाणात गळती होत असून कालव्याची अत्यंत  दयनीय अवस्था झाली आहे. कालव्याची साफसफाई व दुरुस्तीची कामे वेळोवेळी होत नसल्याने कालव्याला विविध ठिकाणी भगदाड पडून लाखो लिटर पाण्यासह शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crack to bhatsa canal agriculture water damage ysh